मुंबई : पक्ष सोडताना आणि सोडल्यानंतर पक्षावर टीका करणाऱ्यांना पक्षाचे दरवाजे बंद असतील, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी दिले.
माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पत्रकार परिषदेत पवार यांनी हे संकेत दिले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने आठ जागांवर विजय मिळविला. यामुळे अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक आमदार परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा असताना पवार यांनी फक्त निष्ठावंतांनाच पक्षाचे दार उघडे असेल असे संकेत दिल्यामुळे परतीच्या मार्गावर असलेल्या आमदारांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. पक्षाला मदत होऊ शकेल, अशा साथीदारांचे स्वागत करण्यात अडचण नाही. पण प्रत्येक व्यक्तीगणिक याबाबत निर्णय होऊ शकतो, असे पवारांनी स्पष्ट केले.
आरक्षणाबाबतच्या आंदोलनावर पवार म्हणाले, ओबीसी, मराठा समाजात दरी असणे ही समाज, राज्य आणि नव्या पिढीच्या दृष्टीने योग्य नाही. समाजात कटुता राहू नये याची काळजी घेतली पाहिजे. खा. निलेश लंके यांनी संसदेत इंग्रजीत शपथ घेतल्याच्या मुद्द्यावर पवार म्हणाले, जनमानसात काम करणारी व्यक्ती संसदेत जात असेल तर तिच्या भाषेबद्दल प्रश्न उपस्थित करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. त्याला लंके यांनी उत्तर दिले याचा आनंद आहे.