मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणाच्या सुरूवातीलाच जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याचा उल्लेख केला. देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानाच्या जतन व संवर्धनासाठी विकास आराखडा हाती घेण्याची घोषणा केली. तर, जागतिक क्षमता केंद्रासाठी पुणे हे देशातील सर्वाधिक पसंतीचे स्थान ठरत असल्याचे सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांना विविध अर्थसंकल्पीय तरतुदींचा फायदा होणार आहे. पंढरपूर मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून पुढील विकासकामांचे नियोजन प्रगती पथावर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर, देशभरातील निवडक क्षेत्रांच्या आर्थिक वाढीचा रोड मॅप तयार करण्यात येत असून मुंबई महानगरच्या धर्तीवर पुणे ग्रोथ हब प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुरंदर येथील छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. बारामती येथील विमानतळावरून रात्रीच्या उड्डाणांकरिता सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. तर, कराड विमानतळाच्या विस्तारीकरणाची कामे सुरू होत आहेत.
बारामती व पुरंदर तालुक्यातील अवर्षण प्रवण भागातील क्षेत्रास पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याकरिता निरा - कऱ्हा नदीजोड प्रकल्प राबविण्यात येईल. तर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर व अन्य धोके निवारणासाठी राज्य जागतिक बँकेच्या सहाय्याने 2 हजार 240 कोटी रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्य प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. कार्यक्रम याअंतर्गत कृष्णा खोऱ्यातील पुराचे पाणी भिमा खोऱ्यातील पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी वळविण्याच्या कामांचा समावेश आहेे. तर, ताणतणाव, जीवनशैलीजन्य आजार, मानसिक आरोग्य तसेच प्रतिबंधात्मक केंद्र आरोग्यसेवांसाठी सातारा जिल्ह्यात दरे परिसरात निसर्गोपचार केंद्र उभारण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
रोप वे ः
सातारा जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला वासोटा किल्ला हा किल्ला रोपवे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि रणनीतीचे प्रतीक आहे. पर्यटकांच्या सुरक्षित, सुलभ व पर्यावरणपूरक प्रवेशाकरिता मुनावळे ते वासोटा किल्ला रोपवे प्रकल्प करण्याचे नियोजित आहे.
शक्तिपीठ ः
पवनार, जिल्हा वर्धा ते पत्रादेवी, जिल्हा सिंधुदुर्ग या शक्तिपीठ महामार्गाच्या महामार्ग कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुधारित संरेखनास मान्यता देण्यात आली असून भूसंपादनाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
पुणे-लोणावळा लोकलः
पुणे - लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गिकेच्या 5 हजार 100 कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा पिंपरी- चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव या औद्योगिक पट्ट्यांना थेट लाभ होईल.
पुणे मेट्रो
पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-2 मधील खडकवासला - स्वारगेट- हडपसर-खराडी मेट्रो मार्गिकेच्या उपमार्गिका हडपसर ते लोणी-काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. पुण्यातील रामवाडी ते वाघोली दरम्यान 11 किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पास देखील मान्यता देण्यात आली आहे. येरवडा ते कात्रज तसेच हिंजेवाडी ते सिंहगड रोड या 54 किलोमीटर दुहेरी भुयारी मार्गाचा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात येत आहे.
उन्नत मार्ग ः
पुणे ते शिरूर हे 53 किलोमीटर लांबीचे 7 हजार 514 कोटी रुपये किमतीचे उन्नत मार्गाचे काम मंजूर करण्यात आले आहे. तळेगाव-चाकण हा 6 हजार 499 कोटी रुपये किमतीचा 25 किलोमीटर लांबीचा उन्नतमार्ग व चाकण- शिक्रापूर या 5 हजार 232 कोटी रुपये किमतीच्या 28 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सहापदरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुणे ते छत्रपती संभाजीनगर जलद व सुलभ प्रवासासाठी शिरुर ते छत्रपती संभाजीनगर या 192 किलोमीटर लांबीच्या 14 हजार 886 कोटी रुपये किमतीच्या ग्रीनफील्ड महामार्गाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. हडपसर-यवत या 5 हजार 262 कोटी रुपये किमतीच्या 31.50 किलोमीटर लांबीच्या सहापदरी रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
स्मारके ः
आंबेगाव बुद्रुक, तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील शिवसृष्टी प्रकल्पासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ला परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करण्यात येईल.
छत्रपती संभाजी महाराजांच्या संभाजी मौजे तुळापूर येथील भव्य स्मारकाचे काम जून, 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मौजे वढु बुद्रुक येथील समाधीस्थळाचे काम जून, 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
सातारा येथील अजिंक्यतारा किल्ल्याचे तसेच संगम माहुली, सातारा येथील महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे जतन, संवर्धन व जीर्णोद्धार करण्यात येईल.
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मगावी मौजे कटगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथे भव्य स्मारक उभारण्याचे प्रस्तावित आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.