Maharashtra Fort Conservation Pudhari
मुंबई

Maharashtra Fort Conservation: सह्याद्रीच्या कुशीतले गडकोट जपा; शिवरायांच्या इतिहासाचे बोलके साक्षीदार

दुर्गसंवर्धनासाठी शासनासोबत दुर्गप्रेमींचा पुढाकार आवश्यक; गडांचे पावित्र्य आणि भूराजकीय महत्त्व जपण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

सुनील दत्ताराम कदम, बदलापूर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गडकोटदुर्ग. हे आपले किल्ले म्हणजे साक्षात महाराष्ट्राचे आणि सह्याद्रीचे वैभव, मराठ्यांच्या अजरामर अशा इतिहासाची साक्ष म्हणजे आपले हे गडकोटदुर्ग. निस्वार्थी सह्याद्रीच्या कुशीत वास्तव्यास असलेल्या या गड-किल्ल्यांचे जतन-संवर्धन करणे हे आपले परम कर्तव्य आहे. किल्ल्यांचे पडलेले दरवाजे, ढासळलेले बुरुज आणि तटबंदी या आजही तेवढ्याच बोलक्या आहेत, जेवढ्या त्या सुरुवातीला होत्या.

पण दुर्भाग्य यावं ते आपल्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांनाच, भारतात बहुतेक किल्ले आहेत आणि तेदेखील अगदी व्यवस्थित. परंतु ज्या लढाया आपल्या महाराष्ट्राच्या किल्ल्यांनी अनुभवल्या आहेत, त्या इतर कोणत्याच राष्ट्रातील किल्ल्यांनी अनुभवल्या नसतील, त्यामुळेच तर शौर्याची गाथा अजरामर ठेवत आज मोडक्या स्थितीत आपले अस्तित्व टिकवीत, आस्मानीसुलतानी संकटांना तोंड देत इतिहासाची साक्ष देत ते गडपुरुष खंबीरपणे उभे आहेत.

350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांबाबतच्या संकल्पना खरोखरच अद्वितीय म्हणाव्या लागतील. त्यांनी द्रष्टेपणाने आपल्या सर्वांचे भविष्य जाणलेच होते. आपण त्यांचा इतिहास तरी पुढील पिढीकडे योग्य तऱ्हेने पोहोचवला पाहिजे. महाराष्ट्र म्हणजे दुर्गांचा देश. खरंतर महाराष्ट्राची

भूरचना नैतिक जडणघडण म्हणजे जिओपोलिटिकल स्ट्रक्चर अँड रोल आणि येथील किल्ल्यांचे एक अतूट नातं आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या संख्येचा विचार केला तर बहुतांश किल्ले 73 व 740 रेखांश आणि 200 ते 17 अक्षांशाच्या चौकटीमध्ये आहेत आणि शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा नेमका हाच गाभा होता. महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलावर दूरगामी परिणाम करणारे साल्हेर, मुल्हेर, धोडप, शिवनेरी, राजगड, रायगड, प्रतापगड, सिंहगड, विशाळगड, पन्हाळगड, कुलाबा, विजयदुर्ग, जंजिरा, सिंधुदुर्ग इत्यादी किल्ल्यांचा नेमका समावेश याच दुर्गभरल्या प्रदेशात होतो. यातूनच किल्ले आणि महाराष्ट्राची भूराजकीय जडणघडण यांचं नातं अधिक जाणवत.

पुरातत्व विभाग आणि सरकार ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्याची भूमिका पार पाडतेच आहे; त्याच्या जोडीला दुर्ग अभ्यासक, दुर्गप्रेमी आणि तरुणाईचा पुढाकार अपेक्षित आहे. जेव्हा दुर्गप्रेमी गडकोटदुर्गाचे ऐतिहासिक रूप जपण्यासाठी स्वयंस्फूर्तीने एकटवतील, तेव्हा सरकारचा निधी अधिक चांगल्या उपाययोजनांसाठी वापरता येईल. त्यामुळे हे गड जपण्याची जबाबदारी प्रत्येक दुर्गप्रेमीची आहे.

त्यामुळे किल्ल्यांचे पावित्र्य जपण्याचा आणि त्यांचे संवर्धन करण्याचा प्रयत्न आपणच करायला हवा. या अशा कामांसाठी भरपूर वेळ, मेहनत आणि पैसा अशा अनेक गोष्टी लागणार आणि त्याची कमतरता

भासणार. तरीही जिद्दीने आणि मेहनतीने हे कार्य करणे प्रत्येक शिवभक्ताचं कर्तव्य आहे. दुर्गसंवर्धनासाठी पुरातत्व विभाग त्यांच्यामार्फत काम करतच आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात कित्येक दुर्गसंवर्धक संस्था, दुर्गप्रेमी लोक संवर्नाधसाठी आपले योगदान देत आहेत. आपणही मित्रमंडळी, परिवारासमवेत गडकोट संवर्धन मोहिमेत तन-मन-धनाने सहभागी व्हायला हवे. कारण गडकोट ही आपली सांस्कृतिक संपत्ती आहे. जिवंत आणि ज्वलंत इतिहास आहे. आज आपण जे कोणी आहोत,आपले जे क्षेम चालेलेले आहे, दिवाळी-दसरा धार्मिक सण आनंदात करतो आहोत ते या दुर्गांमुळे. हेच दुर्ग शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाचे बोलके साक्षीदार आहेत. त्यांचे संवर्धन,जतन करणे ही प्रत्येक महाराष्ट्रीयाची जबाबदारी आहे.

गडाचे ऐतिहासिक महत्त्व टिकवण्यासाठी गडाखाली किंवा त्या परिसरात योग्य कामे केली पाहिजेत. एखादी दुर्गप्रेमी संस्था किल्ले दत्तक घेऊन विकसित करीत असेल तर तशा संस्थेला ते द्यावे, मात्र त्यांची मालकी या किल्ल्यांवर प्रस्थापित होणार नाही याची काळजी घेतली जाणे अत्यावश्यक आहे.

युरोप,अमेरिकेमध्ये ऐतिहासिक ठिकाणे अशा स्थानिक मंडळांच्या ताब्यात दिली जाऊन त्यांचे जतन, संवर्धन केले जाते,

त्या पद्धतीचा अभ्यास करून त्यातील दोष काढून टाकून आपल्याकडेही करावे. या संस्थांनी

त्या स्थळाचे ऐतिहासिक संदर्भ देणारे माहिती फलक लावणे, अवशेषांची काळजी घेणे, सुशोभीकरण करणे, वृक्ष-वेली लावणे या गोष्टी कराव्यात. कोणत्याही संस्थेला यातील ऐतिहासिक अवशेष हलविण्यास प्रतिबंध असावा, तसेच कोणत्याही संस्थेला एक किल्ला प्रतिपालनासाठी अल्प मुदतीने द्यावा. परंतु अधिक काळ देऊ नये. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि किल्ले यांचा तर अतुट संबंध आहे.

परंतु सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, कदंब, यादव, बहमनी, नंतरच्या पशाह्या, पोर्तुगीज यांचाही दुर्गबांधणीत सहभाग दुर्लक्ष

करण्याजोगा नाही. शिवकाल हा किल्ल्यांची उभारणी आणि त्यांचा उपयोग यांचा विचार करता सुवर्णकाल म्हणायला पाहिजे. शिवरायांचे दुर्गकारण हा मात्र विशेष लक्ष देण्याबाबत अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. दुर्गबांधणी अन्‌‍ दुर्गविज्ञान यांचाही बराच घनिष्ठ संबंध आहे. तशा दृष्टीने किल्ल्यांकडे पाहायला शिकले पाहिजे. दुर्गबांधणी तंत्राचा परमोच्च आविष्कार शिवदुर्ग रचनेत आढळतो, पण त्याचे नेमक मर्म आपल्याला कोणी उलगडून सांगत नाही. किल्ले आणि इतिहास भावनांना हात धरून चालले पाहिजे. किल्ले आणि निसर्ग संपदा, किल्ले अन्‌‍ साहसे अशा अनेक गोष्टी आजही महाराष्ट्रात घडत आहेत, पण किल्ल्यांचा अभ्यास यात फारसा अंतर्भूत नाही, ही उणीव दूर करण्याची तळमळ हवी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT