हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : नागपूर येथील दिघोरी भागातील तरुणाचा तब्बल आठरा तासानंतर गुरुवारी दुपारी बारा वाजता भाटेगाव कालव्यात मृतदेह सापडला. प्रशांत वानखेडे असे या तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागपूर येथील दिघोरी भागातील पाच जण त्यांच्या कारने बुधवारी वारंगा फाटा मार्ग तुळजापूरकडे दर्शनाला निघाले होते. बुधवारी दुपारी तीन वाजता त्यांनी वारंगा फाटा नजीक भाटेगाव कालव्याच्या बाजूला करून जेवण केले.
मात्र कालव्यात हात धुण्यासाठी गेलेले निलेश देवमुराद व प्रशांत अशोकराव वानखेडे पाण्यात वाहून गेले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने नीलेशचा मृतदेह कालव्याच्या बाहेर काढला. मात्र प्रशांतचा मृतदेह सापडत नव्हता.पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भगवान वडकिले, जमादार प्रभाकर भोंग यांनी बुधवारी दुपारपासून प्रशांतचा शोध सुरू केला होता.
मात्र कालव्याला मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे मृतदेह शोधण्यात अडचणी वाढल्या. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक बोधनापोड यांनी उर्ध्व पेनगंगा प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधून इसापूर धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करण्याची विनंती केली. त्यानुसार पाण्याचा विसर्ग कमी केल्यानंतर प्रशांत वानखडे यांचा मृतदेह आज दुपारी बारा वाजता सापडला.