कोल्हापूर

Terwad Bandhara Kolhapur: तब्बल ४१ दिवसांनंतर तेरवाड बंधारा वाहतुकीसाठी खुला

बंधारा बंद असल्याने शिरढोण, तेरवाड व कुरुंदवाड परिसरातील शेतकरी आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती

पुढारी वृत्तसेवा

शिरढोण : तेरवाड (ता. शिरोळ) येथील बंधारा तब्बल ४१ दिवसांनंतर गुरुवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला झाला. धरण क्षेत्रात झालेला दमदार पाऊस, राधानगरी धरणातून होणारा विसर्ग तसेच कर्नाटकातील हिप्परगी धरणातून कमी प्रमाणात सोडण्यात येणारा पाण्याचा प्रवाह यामुळे बंधाऱ्यातील पाणीपातळी हळूहळू कमी झाली. पाणीपातळी कमी झाल्यानंतर बंधाऱ्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली.

बंधारा बंद असल्याने शिरढोण, तेरवाड व कुरुंदवाड परिसरातील शेतकरी आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. शिरढोण येथील अनेक शेतकऱ्यांची तेरवाड हद्दीत शेतजमीन आहे. तसेच तेरवाड येथील शेतकऱ्यांची शिरढोण हद्दीत शेती असल्याने या दोन्ही गावांतील शेतकऱ्यांसाठी हा बंधारा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

बंधारा बंद असल्याने तेरवाड येथील शेतकऱ्यांना शिरढोण-पंचगंगा पुलावरून कुरुंदवाड मार्गे शेताकडे जावे लागत होते. त्यामुळे अतिरिक्त अंतर कापावे लागत असल्याने वेळ आणि इंधनाचा खर्च वाढला होता. शेतीच्या कामांसाठीही शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. गुरुवारी सकाळी बंधारा वाहतुकीसाठी खुला झाल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दैनंदिन वाहतूक पूर्ववत झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांची गैरसोय दूर

तेरवाड बंधारा बंद असल्याने शिरढोण, तेरवाड व कुरुंदवाड परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत होता. दोन्ही गावांतील शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलीकडे असल्याने बंधारा महत्त्वाचा आहे. ४१ दिवसांनंतर बंधारा खुला झाल्याने वेळ व इंधनाची बचत होणार असून गैरसोय दूर झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT