

श्रीरामपूर: तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथील प्रवरा नदीवरील मालुंजा - माहेगाव बंधारा (केटी वेअर) सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी वडाळा पाटबंधारे विभागामार्फत कार्यकारी अभियंता, अहिल्यानगर पाटबंधारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बंधाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात आले असून विविध तांत्रिक समस्या गंभीर बनल्या आहेत. पुराच्या पाण्यामुळे बंधाऱ्याच्या उत्तर व पूर्व बाजूचा भराव वाहून गेला आहे. त्यामुळे कडेला मोठे खड्डे पडून बांधकाम उघडे पडले आहे. तसेच बंधाऱ्याच्या मध्यभागी असलेले संरक्षक लोखंडी पाईप पूर्णपणे गायब झाले असून प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दक्षिण व पश्चिम बाजूसही परिस्थिती चिंताजनक आहे.
पुराच्या पाण्यामुळे बंधारा आणि नदीकाठ यांच्यामध्ये ‘व्ही’ आकाराची खोल दरी निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात भराव खचून वाहून गेला आहे. परिणामी, या भागात लांब-रुंदीचे खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे महिला, विद्यार्थी व नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, अनेक वर्षांपासून दुरुस्तीची मागणी होत असतानाही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. येत्या जून 2026 च्या पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
अन्यथा आंदोलनाचा इशारा
बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास भविष्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास त्यास संबंधित विभाग जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच मागणीची दखल न घेतल्यास बाळासाहेब बडाख, श्रीकृष्ण बडाख, किशोर बडाख, अरुण बर्डे, बाळासाहेब बोरुडे व संदीप बडाख यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.