नगर, पुढारी वृत्तसेवा : कंटेनरने ॲपेरिक्षाला दिलेल्या जोराच्या धडकेत सात प्रवासी जागीच ठार झाले. ही घटना कोपरगाव महामार्गावर पगारे वस्तीनजीक आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. अपघात इतका भीषण होता की, ॲपेरिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात दोन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचाही मृत्यू झाला आहे. तसेच दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातील राजाबाई साहेबराव खरात (वय 60, रा. चांदेकसारे, ता. कोपरगाव), आत्माराम जमानसा नाकोडे (वय 65 रा. वावी ता. सिन्नर), पूजा नानासाहेब गायकवाड (वय 20, रा. हिंगणवेढे), प्रगती मधुकर होन (वय 20 रा. चांदेकसारे ता. कोपरगाव), शैला शिवाजी खरात (वय 42), शिवाजी मारुती खरात (वय 52) दोघेही राहणार श्रीरामपूर अशी मयताची नावे आहेत. अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी दिली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, झगडेफाट्यावरून ॲपेरिक्षा पॅसेंजर घेऊन कोपरगावकडे जात असताना, पगारे वस्तीजवळ कोपरगावहुन येत असलेल्या कंटेनरने जोरात धडक दिली आणि हा भीषण अपघात घडला. यामध्ये ॲपेरिक्षातील सात प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी रुग्णालयात दाखल केले आहे.