Latest

Lockdown In India : भारतात लॉकडॉऊनची गरज नाही! आयआयटी कानपूरने दिली माहिती

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या दोन वर्षांपासून थैमान घातलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा मान वर काढली आहे. चीनमध्ये कोविड रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे भारतात देखील आता या वाढत्या रुग्णांची संख्या पाहून चिंता व्यक्त केली जात आहे. ही सर्व परिस्थिती पाहता पुन्हा एकदा लॉकडॉऊन होणार अशी शंका आता निर्माण झाली आहे. IIT कानपूरने याबाबत एक भविष्यवाणी केलेली आहे. भारतात कोविडबाबत सध्या कोणतेही निर्बंध घालण्याची गरज नाही, याविषयीची माहिती या संस्थेमार्फत देण्यात आली आहे. (Lockdown In India)

आयआयटी कानपूरने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील लोकांनी घाबरुन न जाता धैर्याने काम केले पाहिजे. चीनमधील परिस्थिती आणि भारतातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. चीनमध्ये झपाट्याने वाढणारा कोविड आणि भारतात पसरत चाललेली अस्वस्थता यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. आयआयटीचे प्राध्यापक महिंद्रा अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील ९८ टक्के लोकांमध्ये कोविडविरुद्ध लढण्यासाठी नैसर्गिक प्रतिकारशक्ती आहे. ज्या लोकांची प्रतिकार क्षमता कमकुवत आहे अशा लोकांना याची लागण होऊ शकते, मात्र हे प्रमाण कमी असू शकते. त्यामुळे ही एक छोटीशी कोविडची लाट येऊ शकते. (Lockdown in India)

ही सर्व परिस्थिती पाहता भारतात सध्या कोविड विषयी काळजी करण्यासारखे काही नाही. नवीन वर्षाच्या पार्ट्या, लग्नसोहळ्यांवर बंदी घालण्याची देखील गरज नाही. कोविड विरोधात दिली जाणारी लस केवळ काही काळच संरक्षण देते. मात्र भारतातील लोकांची प्रतिकार क्षमता समाधानकारक असल्याने लसची देखील गरजही नाही. कोणतेही निर्बंध न घालता ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात झाले पाहिजे.

चीनच्या लोकांची फक्त २० % प्रतिकारशक्ती

प्राध्यापक अग्रवाल यांनी एका अहवालाच्या आधारे सांगितले की, ऑक्टोबर अखेर चीनमधील केवळ ५ टक्के लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती होती. नोव्हेंबरमध्ये याच परिस्थितीमध्ये 20 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळेच चीनमध्ये नोव्हेंबर महिन्यापासून कोविडची लाट झपाट्याने पसरली आहे. त्याचबरोबर चीनमध्ये कोविडच्या ५०० प्रकरणांपैकी फक्त एक प्रकरण सार्वजनिकपणे उघड केले जात आहे, असा आरोप देखील चीनवर केलेला आहे.

चीनच्या अडचणीत होणार वाढ

चीनची ३० टक्के लोकसंख्या अजूनही व्हायरसच्या आवाक्याबाहेर आहे. याचाच अर्थ, चीनला पुढे मोठा धोका आहे. Omicron चा व्हायरंट संपूर्ण लोकसंख्येपर्यंत पसरेल. या नवीन प्रकरणांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सुमारे 90 टक्के लोकसंख्येला संसर्ग होण्याची देखील शक्यता वर्तविली आहे. सेरो-सर्वेक्षणाद्वारे कोविडचा प्रसार किती झाला आहे हे समजते. चीनचे असे कोणतेही सर्वेक्षण झालेले आढळून येत नाही. यावरुन चीनमध्ये जशी परिस्थिती आहे तशी भारतात आहे असे अजिबात नाही हे खरं.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT