तासगाव, पुढारी वृत्तसेवा : अंजनी (ता. तासगाव) हद्दीत सावळज रस्त्यावर शॉर्टसर्किटने आग लागून कार (एम.एच.14, ए. 7250) जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. अंजनी येथे गुरुवारी आठवडा बाजार होता. बाजारात भाजीपाला विक्री करण्यासाठी विनायक सदाशिव पवार आणि विनायक पाटील (दोघेही रा. कुची, ता. कवठेमहांकाळ) हे भाजी घेऊन कारमधून आले होते.
सायंकाळी अंजनी गावापासून काही अंतरावर गाडीत आगीच्या ठिणग्या दिसू लागल्या. क्षणार्धात कारने पेट घेतला. काही वेळात गाडी जळून खाक झाली. रस्त्यालगत असणार्या बागेला गाडीच्या आगीच्या झळा बसल्यामुळे नवीनच फुटलेल्या द्राक्षवेलींचेही नुकसान झाले आहे. सदर घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती.