"त्यांना' सुबुद्धीचे अजीर्ण झालेले आहे, संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
नागपूर; पुढारी वृत्तसेवा : संजय राऊत वारंवार नागपुरला आले तर त्यांना थोडी सुबुद्धी मिळेल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी माध्यमांशी बोलताना हाणला होता. तर, फडणवीस बरोबर बोलले आहेत. त्यांना सुबुद्धीचे अजीर्ण झालेले आहे, असा पलटवार संजय राऊत यांनी गुरूवारी (दि.२२) रात्री विमानतळावर माध्यमांशी बोलताना केला. राऊत शिवसंपर्क अभियानातंर्गत नागपूर दौऱ्यावर आले आहे.
नागपुरला महत्व आहेच आहे. नागपूर उपराजधानी आहे आणि नागपूरकरांचे प्रेम वाढत आहे. बरेचसे नागपूरकर हल्ली मुंबईला असतात. त्यामुळे आम्ही आमचा मुक्काम नागपुरला हलवला, असा टोला राऊत यांनी हाणला. दिल्लीतील दंगे कोणी भडकवले हे देशाला माहिती आहे. देशातील वातावरण खराब करण्याचे प्रयत्न चांगले नाहीत.
अमरावतीमध्ये हिंदुंना टारगेट करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. हा या शतकातील सर्वात मोठा विनोद असल्याचा टोला राऊत यांनी हाणला. या संदर्भात विचारले असता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पूत्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेने हिंदुत्वाकरीता बलिदान दिलेले आहे. त्यामुळे या आरोपात तथ्य नाही असे ही संजय राऊत यावेळी म्हणाले.