Latest

रणजी ट्रॉफी : रजत पाटीदारचे मुंबईविरुद्ध शानदार शतक

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशचा आघाडीचा फलंदाज रजत पाटीदारने मुंबईविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शानदार शतक ठोकले. पाटीदारचे या हंगामातील दुसरे शतक आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन पाटीदारने शतक केल्याने महत्त्वपूर्ण मानले जात आहे. मध्य प्रदेशचे पहिल्या डावातील हे तिसरे शतक असून यापूर्वी यश दुबे आणि शुभम शर्मा यांनी शतके झळकावली होती. पाटीदार याच्या शतकी खेळीमुळे मध्य प्रदेशची बाजू भक्कम झाली आहे.

रणजी ट्रॉफी २०२२ च्या हंगामात रजत पाटीदार याने आपल्या संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. पाटीदारने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पंजाबविरुद्ध ८५ धावा केल्या. त्याचवेळी बंगालविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने पहिल्या डावात १७ धावा आणि दुसऱ्या डावात ७९ धावा केल्या आहेत. तर अंतिम फेरीत शतक ठोकले आहे.

पाटीदारने मुंबईविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत १६४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने १७ चौकार मारत मुंबईच्या गोलंदाजांची भंबेरी उडवली. या हंगामातील त्याचे हे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने १४२ धावांची खेळी केली आहे. याशिवाय रजतने ५ अर्धशतकेही झळकावली आहेत.

रजत पाटीदार सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. या हंगामात तो रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत ६०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याचा आयपीएल फॉर्म रणजी ट्रॉफीमध्येही कायम आहे. आयपीएल २०२२ मध्ये पाटीदारने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या. त्यामुळे आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पात्र ठरण्यात यशस्वी ठरला. १५ व्या सत्रात त्याने एका शतकासह २ अर्धशतके झळकावली.

दरम्यान, उपाहारापर्यंत मध्य प्रदेशने पहिल्या डावात ६ विकेट गमावत ४७५ धावा केल्या होत्या. रजत पाटीदार १२० आणि सर्शन जैन २० धावांवर नाबाद आहेत. मध्य प्रदेशची आघाडी १०१ धावांची झाली आहे. मुंबईने पहिल्या डावात ३७४ धावा केल्या आहेत.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT