मुंबई, पुढारी ऑनलाईन : राज्यातील फोन टॅपिंग प्रकरण आणि बदली घोटाळा प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) राज्य सरकारवर पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला. ही प्रकरणे बाहेर काढल्याने चौकशीसाठी मला मुंबई पोलिसांनी नोटीस पाठविली आहे. रविवारी सकाळी ११ वाजता मी बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले की, चौकशीदरम्यान, पोलिसांना योग्य उत्तर देणार आहे. पोलिसांनी चुकीची केस केली असली, तरी मी चौकशीला सहाय्य करणार आहे. राज्यातील महाघोटाळा समोर आणला आहे. आपला घोटाळा दाबण्यासाठी राज्य सरकारडून एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मार्च २०२१ मधील बदली घोटाळा आम्ही बाहेर काढला. त्याची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. सरकारच्या षड्यंत्राचा भांडाफोड सभागृहात केल्याने मला नोटीस पाठविण्यात आली आहे, असाही आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला. माहितीचा स्त्रोत मला विचारू शकत नाहीत. तसेच मला तो सांगणंही बंधनकारक नाही. बदली घोटाळ्याचा अहवाल केंद्रीय गृहसचिवांना पाठवला आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्यासाठी गुन्हा दाखल केला असून मला एक प्रश्नावली पाठवली आहे. परंतु बदली घोटाळ्याचा अहवाल सहा महिने सरकारकडे धूळखात पडला असून कुठलीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणी सरकारवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, ज्यांनी घोटाळा बाहेर काढला त्यांचीच चौकशी केली जात आहे. मी पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करणार आहे. ऑफिशियल सिक्रेट अॅक्टनुसार राज्य सरकारने गुन्हा दाखल केला आहे.
पेन ड्राईव्हमधील क्लिपचे फॉरेन्सिक ऑडिट झाले असून याची सीबीआय चौकशी सुरू आहे. याबाबतच्या आरोपांचे खंडण करणाऱ्या सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावरही फडणवीस यांनी निशाणा साधला. प्रवीण चव्हाण यांच्याबद्दल लवकरच गौप्यस्फोट करणार आहे. क्लिप खोट्या ठरवण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी आम्ही पूर्ण तयारी केली आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : भविष्यात आप हा देशातील मोठा विरोधी पक्ष म्हणून काम करू शकतो का? राजकीय विश्लेषक संतोष कुलकर्णी