नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर एमआयडीसी पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या राजीव नगर येथे पत्नी व मुलीची हत्या करून पतीने गळफास घेऊन स्वत:ही आत्महत्त्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. राजीव नगरातील सरोदी मोहल्ला येथे राहणारा विलास संपत गवते (वय ४२), त्याची पत्नी रंजना गवते (वय ३५) व मुलगी अमृता गवते (वय १०) ही मृतकांची नावे आहेत.
विलासने धारदार शस्राने पहिले तोंड दाबून पत्नी व मुलीचा गळा चिरला. नंतर स्वत: गळफास घेतला. त्याने मध्यरात्री तीनच्या सुमारास हे कृत्य केले. मुलावर त्याचा जीव असल्याने मुलाला मारले नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी दिली.
सकाळी विलासचा लहान मुलगा (वय १२) बाथरूमला जाण्यासाठी उठल्यावर हे दृष्य पाहून घाबरला. त्याने शेजारी राहणाऱ्या काकांना याची माहिती दिली. विलास गवते याला दोन मुली व एक मुलगा अशी तीन मुले होती. मोठ्या मुलीचे लग्न झाले होते. नागपूर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक उमेश बेसरकर यांनी घरगुती कलहातून हा प्रकार घडल्याचे सांगितले.
मोहल्ल्यात त्याचे कोणाशीच पटत नव्हते. कायम चिडचिड करीत असे. तो स्वत: काहीही कामधंदा करीत नव्हता. त्याची पत्नी व दीर दुधाचा व्यवसाय करीत होते. त्याचा भाऊ आई वडिलांसह शेजारीच राहतो.
विलासच्या स्वभावात फरक पडावा म्हणून झाडफूकही करण्यात आली. परंतु काही फरक पडला नाही. त्याला अनेकदा उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिथून तो पळून येत असे. घरच्यांना तो नेहमी मारून टाकण्याची धमकी देत असे. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्याने फाशी घेतली नसती तर लोकांनी त्याला मारले असते, असे बेसरकर यांनी सांगितले.