Latest

Nipah Virus in Kerala : निपाह विषाणूमुळे मृत्यूचे प्रमाण कोरोनापेक्षा जास्त : ICMR

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : निपाह विषाणूच्या संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. निपाह विषाणूचा संसर्ग झालेल्या रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा जास्त आहे, असे तज्ञांचे मत आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) प्रमुख डॉ. राजीव बहल यांनी "निपाह विषाणूमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कोरोनापेक्षा जास्त आहे" असे म्हटले आहे.

संबंधित बातम्या : 

डॉ. बहल यांच्या मते, निपाह विषाणूचा मृत्यू दर ४० ते ७० टक्के आहे, तर कोविडचा मृत्यू दर २ ते ३ टक्के होता. केरळमधील कोझिकोडमध्ये शुक्रवारी निपाह विषाणूच्या एका नवीन प्रकाराची पुष्टी झाली असून, राज्यातील एकूण संक्रमित रूग्णांची संख्या सहा झाली आहे. डॉ. बहल यांनी पीटीआयला सांगितले की, आम्हाला २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे काही डोस मिळाले. सध्या आमच्याकडे एवढीच औषधे आहेत की ज्याच्या मदतीने आम्ही दहा रुग्णांवर उपचार करू शकतो.

ते म्हणाले की, भारताबाहेर निपाह विषाणूची लागण झालेले १४ रूग्ण मोनोक्लोनल अँटीबॉडी घेतल्यानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. औषधाच्या सुरक्षिततेची पुष्टी करण्यासाठी फक्त फेज १ चाचणी केली गेली आहे. परंतू प्रभावीतेची चाचणी अद्याप झालेली नाही.

वाढत्या केसेस पाहता कोझिकोडमधील सर्व शैक्षणिक संस्था आजपासून आठवडाभर बंद राहणार आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी शुक्रवारी सांगितले की, केरळमधील निपाह विषाणूच्या रुग्णांची संपर्क यादी १ हजार ८० वर पोहोचली आहे. यामध्ये ३२७ आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT