५ नोव्हेंबरला विष्णूदास भावे (Vishnudas Bhave) यांच्या जयंती निमित्त मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातो. तर वैश्विक स्तरावर २७ मार्चला रंगभूमी दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र ते आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विविध नाटकांचा आवाका खूपच मोठा आहे. महाराष्ट्रातही नाटकांचा पसारा मोठाच! आज महाराष्ट्रात मराठी रंगभूमी दिन साजरा केला जातोय. विष्णुदास भावे यांनी दि. ५ नोव्हेंबर, १८४३ रोजी सांगली संस्थानच्या राजवाड्यातील 'दरबार हॉलच्या रंगमंचावर 'सीता स्वयंवर' हे मराठीतील पहिले गद्य पद्यमिश्रित नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी नाट्य रंगभूमीचा पाया रचला. (मराठी रंगभूमी दिन)
गडकरी यांचा 'एकच प्याला', पुलं देशपांडे यांचे 'ती फुलराणी', 'एक झुंज वार्याशी', 'तीन पैशाचा तमाशा', वि. वा. शिरवाडकर यांचे 'ययाति'. तसेच 'वीज म्हणाली धरतीला', 'नटसम्राट' तर महर्षी कर्वे यांच्या जीवनावर आधारित 'हिमालयाची सावली', शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या जीवनावर 'घर तिघांचं हवं' आधारित नाटक तर 'झोपी गेलेला जागा झाला', ' दिनूच्या सासूबाई राधाबाई', 'पळा पळा कोण पुढे पळे तो', 'हा तेरावा' अशी तर विजय कदम, लक्ष्मीकांत बेर्डे यांचा 'टूरटूर' अशा विनोदी नाटकांनी रसिकांची मने जिंकली. सर्वच नाटके वाखाणण्याजोगी आहेत.
ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे 'आधे अधुरे,' भक्ती बर्वे अभिनीत 'तू फुलराणी,' मोहन आगाशे यांचे 'घाशीराम कोतवाल,' चंद्रकांत काळेंचे 'बेगम बर्वे' व निळू फुले यांचे 'सखाराम बाईंडर' ही नाटके आजही रसिकांच्या मनात ठसलेली आहेत. 'अलबत्त्या गलबत्त्या,' 'मोरुची मावशी,' 'ती फुलराणी' यांसारख्या नाटकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मराठी रंगभूमी दिनानिमित्त तुम्ही ही पुढील नाटके पाहायला हवीत. ही नाटके पाहिल्यानंतर तुम्हीही त्याच्या प्रेमात पडू शकता.
कला म्हणजे समाजामध्ये संदेश पोहोचवण्याचे एक साधन आणि कलाकाराच्या अभिनयाचा कस जेथे लागतो, ते व्यासपीठ.नाटकाच्या या व्यासपीठावरच कलाकारांच्या अभिनयाची खरी कसोटी लागते. नाटकातील मंडळी पुढे चित्रपटात गेली तो भाग वेगळा. पण, मराठी रंगभूमीतून आजवर कसदार अभिनेते उदयास आली.
आज कॉम्प्युटरचं युग. या जगात कॉम्प्युटरबरोबरचं मोबाईलसारख्या अनेक डिजीटल माध्यमांनी आपलं विश्व मांडलं आहे. सिनेमा, मालिका ते अगदी वेबसीरीजपर्यंत या माध्यमांमध्ये आपण गुंतलो आहे. तरीही नाटकप्रेमी आपली नाटके पाहायची विसरत नाहीत. मग, तुम्हीही थोडं कॉम्प्युटर, मोबाईलमधून डोकं बाहेर काढून ही नाटके पाहू शकता.
डिजिटल मीडियातलं वलय कलाकारांना खुणवत असलं तरीही अनेक मातब्बर कलाकार स्वतःला रंगभूमीवर स्वतःला आजमावून पाहत आहेत. महाराष्ट्रात संगीत नाटकांपासून अगदी बालनाट्याची परंपरा आहे. त्यामुळे आबालवृद्ध मराठी रसिक हमखास नाटके पाहायला जातोच.
'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं', या गाण्याने धुमाकूळ घातला होता. 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकात अभिनेता प्रशांत दामलेने खळखळून हसवलं होतं. एका लग्नाची गोष्ट या नाटकात लग्नाच्या आधी आणि लग्नानंतरच्या गंमतीजमती मांडण्यात आल्या होत्या. प्रशांत दामले- कविता मेढेकर ही जोडी हिट ठरली होती. 'एका लग्नाची गोष्ट' नाटकाचे लेखक श्रीरंग गोडबोले हे आहेत.
आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या 'मोरूची मावशी' या नाटकातली अभिनेते विजय चव्हाण यांची भूमिका प्रचंड गाजली. या नाटकाने प्रेक्षकांच्या गळ्यातले ते ताईत बनले. या नाटकाचे २ हजारहून अधिक प्रयोग झाले होते. 'मोरूची मावशी' हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेले नाटक ठरले. स्त्री भूमिकेत ते फुगडी घालायचे, पिंगा घालायचे, त्यांच्या तोंडी असलेले टांग-टिंग..टिंगाक टांग-टिंग..
टांग-टिंगाक टूम.. हे गाणे तोंडपाठ झाले होते. त्यापाठोपाठ 'अशी ही फसवाफसवी', 'तू तू-मी मी' ही नाटकेही गाजली. रंगभूमीवर त्यांचा वावर अत्यंत सहजसुंदर असायचा. विनोदी भूमिका ते जितक्या सहजपणे साकारायचे, तेवढ्याच सहज खलनायक किंवा गंभीर भूमिकांनाही त्यांनी आपल्या कारकिर्दीत साजेसा असा न्याय दिला होता.
'अलबत्त्या गलबत्त्या' च्या अभूतपूर्व यशानंतर अनेक नाटकं आली. परंतु, त्यातील एक लक्षात राहणारं नाटक म्हणजे 'अलबत्त्या गलबत्त्या'. पालकांनी आपल्या मुलांना हे नाटक दाखवायला हवे. तुम्ही मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 'अलबत्त्या गलबत्त्या' नाटकं दाखवू शकता.
विठ्ठल भक्तीवर वाटणारं हे नाटक स्त्रियांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतो. अवली आणि रुक्मिणी या दोन भूमिका संबंध नाटकभर रसिकांना एका खिळवून ठेवणाऱ्या आहेत.
श्रीरंग गोडबोले लिखित-दिग्दर्शित 'इडियट्स' हे नाटक तसं पाहता विनोदी. तरूण वर्ग लग्नाचा पर्याय न निवडता 'लिव्ह इन'चा पर्याय स्वीकारते. पण, का? या नाटकामध्ये 'लिव्ह इन'च्या विषयाकडे विनोदाने पाहण्यात आले आहे.
पु. ल. देशपांडे लिखित 'ती फुलराणी' गाजलेलं नाटक. George Bernard Shaw यांच्या "Pygmalion" या नाटकावर आधारित आहे. पु.लंच्याच शब्दांत ती फुलराणी म्हणजे स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रम्हघोटाळ्यात सापडलेल्या माणसांची कथा आहे. या नाटकात हयात असेपर्यंत भक्ती बर्वे मुंजुळेची भूमिका करीत. भक्ती बर्वेनंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष या मंजुळाची भूमिका करत. या चौघींनीही लेखक पु.ल.देशपांडे यांच्या मनातली मंजुळा रंगमंचावर साकारली.