नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील ज्ञानव्यापी मशिद, ताजमहाल, श्रीकृष्ण जन्मभूमीसह देशातील इतर वादग्रस्त ठिकाणांचे सत्य लोकांसमोर आले पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इन्द्रेश कुमार (Indresh Kumar) यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वादग्रस्त ठिकाणांचे सत्य बाहेर आले, तर देशाला योग्य मार्गाने जाता येईल, अशी लोकांची भावना असल्याचे सांगून इन्द्रेश कुमार (Indresh Kumar) पुढे म्हणाले की, कोणत्याही रागापोटी किंवा राजकारणामुळे अशा ठिकाणांचे सत्य बाहेर यावे, अशी आमची भूमिका नाही. देशभरात ज्ञानव्यापी मशिद, ताजमहाल, श्रीकृष्ण जन्मभूमीचे सत्य बाहेर यावे, अशी चर्चा सुरू आहे. प्रत्येकाला सत्य जाणून घ्यायचे आहे. लोकानी त्यांची जात, धर्म, पक्ष याच्यावर येऊन देशातील अशा वादांवर तोडगा काढला पाहिजे.
विशेष न्यायालयाच्या निर्देशानुसार वाराणसी येथील ज्ञानव्यापी मशिदीचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. याबाबत कोर्ट कमिशनरला अहवाल न्यायालयाला मंगळवारपर्यंत सादर करायचा आहे. आक्रमकांनी मंदिर पाडून त्याजागी मशीद बांधली असल्याचे हिंदू समाजाचे म्हणणे आहे. याठिकाणी मंदिराचे असंख्य पुरावे असल्याचा दावा असून त्यासाठी हे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.
हेही वाचलंत का ?