औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या डोक्यात वरवंट्याचा पाटा घालून पतीने खून केल्याची घटना घडलीय. सोमवारी (दि. २८) पहाटे जिन्सीतील बायजीपुऱ्यात ही घटना घडली. दरम्यान, जिन्सी पोलिसांनी वैजापूर तालुक्यातील निजामपूरमध्ये पहिल्या पत्नीच्या घरी लपून बसलेल्या मारेकरी पतीला ताब्यात घेतले आहे. (औरंगाबाद खून)
अंजुम खलील शेख (वय ३५, मु. पो. गारज, ता. वैजापुर, ह.मु. ग. क्र. २१ बायजीपुरा, औरंगाबाद) असे मयत महिलेचे नाव आहे. तर, शेख खलील शेख ईस्माईल (रा. मु. पो. गारज, ता. वैजापुर, जि. औरंगाबाद. ह.मु. ग.न. २१ बायजीपुरा) असे आरोपीचे नाव आहे.
खलील हा एका खासगी ट्रॅव्हल्सवर चालक म्हणून कामाला आहे. अंजुम यांचा खलिलशी २००९ ला विवाह झाला होता. त्यांना फैजन (वय ९), फरहन (वय ७) अशी त्यांना दोन मुले आहेत. अंजुमच्या लग्नानंतर एक वर्षानंतर कळले की, खलीलचे परविन शेख यांच्या सोबत लग्न झालेले आहे. त्यांना दोन मुलं व एक मुलगी आहे. २७ मार्चला सकाळी अंजुम या मुलांना चहा देत असताना खालीलने घर खाली करण्याच्या करण्याच्या कारणावरून वाद घातला.
पती खलील याने घराच्या बाहेर असलेल्या पाट्याचा रोटा आणून अंजुम यांच्या डोक्यात टाकला. अंजुम रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. यावेळी पती खलील याने तिथून पळ काढला. शेजाऱ्यांच्या मदतीने अंजुम यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अंजुम यांची प्रकृती खालावल्याने त्यांना घाटी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी अंजुम यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पती खलीलच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीच्या डोक्यात वरवंट्याचा पाटा टाकून खलील हा पहिल्या पत्नीच्या घरी वैजापूर तालुक्यात निजामपूर येथे जाऊन लपून बसला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सूत्र हलवत वैजापूर तालुक्यातील निजामपूर येथील पत्नीचे घर गाठले. खलील हा घरांमध्ये बसलेला आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.