पुढारी ऑनलाईन: परदेशी नागरिकांकडून पैसे पाठवण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, या वर्षी जगभरात स्थायिक झालेल्या भारतीयांनी 87 बिलियन डॉलर म्हणजेच 6,52,500 कोटी रुपये भारतात पाठवले आहेत. यातील 20 टक्क्यांहून अधिक रक्कम अमेरिकेतून पाठवण्यात आली आहे.
परदेशी नागरिकांकडून त्यांच्या घरी पैसे पाठवण्याच्या बाबतीत भारतानंतर चीन, मेक्सिको, फिलिपाइन्स आणि इजिप्तचा क्रमांक लागतो. मात्र, पुढील वर्षी भारतात पाठवण्यात येणाऱ्या रकमेत केवळ तीन टक्क्यांनी वाढ होईल, असा अंदाज देखील वर्ल्ड बँकेने वर्तवला आहे. याचे कारण असे की, कोरोना संकटाच्या काळात एकीकडे भारतातून इतर देशांमध्ये जाणाऱ्या कामगारांची संख्या कमी झाली आहे, तर दुसरीकडे अरब देशातून भारतात परतण्याची वाट पाहणाऱ्यांची संख्याही सातत्याने वाढत आहे.
जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत भारतात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक लोकांच्या आरोग्यावरील खर्चाच्या गरजा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशा परिस्थितीत परदेशात असलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना खूप मदत केली. तसेच कोरोना येण्याअगोदर देखील गेल्या काही वर्षांमध्ये, परदेशात आपल्या नागरिकांकडून पैसे मिळवणाऱ्यांमध्ये भारत अव्वल आहे. जागतिक बँकेच्या अहवालानुसार, कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांना त्यांच्या नागरिकांकडून पैसे पाठवण्याचे प्रमाण यावर्षी 7.3 टक्क्यांनी वाढून $589 अब्ज किंवा सुमारे 44.17 लाख कोटी रुपयांवर जाण्याची अपेक्षा आहे.