आपले उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असले तरीही आयकर विवरणपत्र म्हणजेच इन्कमटॅक्स रिटर्न भरले पाहिजे, असे करसल्लागार आवर्जून सुचवतात. या प्रकारच्या रिटर्नला शून्य किंवा शून्य प्राप्तिकर परतावा, असे म्हणतात.
झिरो आयटीआर दाखल करण्यातून आपण कर अधिकार्यांना औपचारिकरित्या कळवत असतो की, आपले उत्पन्न संबंधित आर्थिक वर्षात करपात्र मर्यादेपेक्षा कमी होते आणि त्या कालावधीसाठी करदायित्व नाही. आयकर कायद्यानुसार, मूळ सवलतीच्या मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी रिटर्न भरणे बंधनकारक नाहीये; पण करदात्याने अनुपालनासाठी आणि आर्थिक नोंदी राखण्यासाठी शून्य रिटर्न भरले पाहिजे. याचे कारण पासपोर्टसाठी अर्ज करायचा असेल किंवा व्हिसा घ्यायचा असेल, तर आयकर रिटर्न तुमचा पत्ता पुरावा बनतो. याशिवाय, जर तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल, तर ते मंजूर होण्यासाठी आयकर रिटर्न आवश्यक आहे. बँका तुमच्या ठेवींवरील व्याजातून टीडीएस कपात करत असतात. अशा परिस्थितीत, या टीडीएसचा परतावा मिळविण्यासाठी शून्य आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे संबंधित संस्था सल्लागार किंवा फ्रीलान्सरना केलेल्या पेमेंटवर तुम्ही टीडीएसदेखील कापू शकता.
तुम्हाला मागील आर्थिक वर्षात झालेल्या नुकसानाची वजावट भविष्यातील कोणत्याही उत्पन्नामधून करायची असेल, तर ते पुढे नेण्यासाठी तुम्ही रिटर्न भरणे आवश्यक ठरते. या रिटर्नद्वारे तुमचे नुकसान नोंदवले जाईल आणि भविष्यात उत्पन्न किंवा नफ्याच्या बदल्यात हा तोटा दाखवून कर कपातीचा लाभ घेता येतो. झिरो रिटर्न तुमच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणूनदेखील काम करतो. ज्यांचा स्वतःचा रोजगार आहे किंवा ज्यांचे उत्पन्न नियमित नाही, त्यांच्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे कारण त्यामुळे आर्थिक बाबतीत त्यांची विश्वासार्हता वाढते. तसेच झिरो रिटर्न भरल्याने तुम्ही कर नियमांचे पालन करत आहात, याची खात्री होते. यामुळे रिटर्न न भरल्याबद्दल आकारला जाणारा संभाव्य दंड टाळण्यास मदत होते.
बंधनकारक नसले तरी झिरो आयटीआर भरतानाही अचूक माहिती देणे महत्त्वाचे आहे. उत्पन्नाच्या स्रोतांवर अवलंबून योग्य आयटीआर फॉर्म वापरला पाहिजे. उत्पन्नाचे सर्व स्रोत नमूद केले पाहिजेत. करदात्यांच्या काही श्रेणींसाठी आयटीआर दाखल करणे अनिवार्य आहे. कोणत्याही बँक किंवा सहकारी बँकेच्या चालू खात्यात जमा केलेली एकूण रक्कम 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्यास आयटीआर भरणे अनिवार्य आहे. जर तुम्ही स्वतःसाठी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसाठी, परदेश प्रवासासाठी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च केला असेल, तर आयटीआर भरणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे एखाद्या करदात्याने वर्षभरात एक लाख रुपयांपेक्षा जास्त वीज बिल भरले असेल तरीही आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे.