Banking sector jobs 2026 |
मुंबई : बँकिंग क्षेत्राला मरगळ आली आहे. येथील रोजगार निर्मितीही थंडावली आहे, अशी चर्चा होत असतानाच या क्षेत्रात करिअर करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणाईसाठी गुड न्यूज आहे. एकीकडे आयटी क्षेत्रात मंदी असताना मागील काही वर्षांपासून सुस्तावलेली बँकिंग क्षेत्रातील भरती प्रक्रिया आता पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. विशेषतः खासगी आणि परदेशी बँकांनी नामांकित शिक्षण संस्थांमधून (IIT आणि मोठ्या मॅनेजमेंट कॉलेज) विद्यार्थ्यांची निवड करण्यास सुरुवात केली आहे.
'द मिंट'ने दिलेल्या वृत्तानुसार, बँकिंग सेक्टरमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चित्र बदलले आहे. आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा, एसएसबीसी, आयडीएफसी फर्स्ट आणि ॲक्सिस यांसारख्या मोठ्या खासगी बँका आता कॅम्पस प्लेसमेंटसाठी सक्रिय झाल्या आहेत.
खासगी बँकांकडून होणारी भरती ही केवळ साध्या कामांसाठी नाही, तर फायनान्स (वित्त) आणि टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान) या क्षेत्रातील तज्ज्ञ तरुणांचा शोध घेतला जात आहे. खासगी बँका फायनान्स आणि टेक्नॉलॉजी गती असणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराच्या ऑफर्स देऊन आपल्याकडे आकर्षित करत आहेत.
गेल्या वर्षी कोरोनानंतरची भरतीची लाट ओसरली होती. व्यवसायातील पत पुरवठा संथ झाला. त्यामुळे बँकांनीही कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली. तसेच नवीन भरती कमी केली होती. मात्र, आता कर्जांची मागणी वाढल्याने आणि व्यवसायाचा विस्तार होत असल्याने बँकांनी पुन्हा एकदा नवीन भरतीसाठी कंबर कसली आहे. मात्र आता बँकिंग क्षेत्र भविष्यातील डिजिटल आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयारी करत आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकांकडून कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण ११.४ टक्क्यांवरून १४.६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. जेव्हा बँका कर्ज वाटप मोठ्या प्रमाणावर करतात तेव्हा कार्यविस्तार सांभाळण्यासाठी कनिष्ठ स्तरापासून उच्च पदापर्यंत मोठ्या टीमची गरज भासते. तंत्रज्ञानामध्ये झालेल्या व्यापक बदलामुळे आता बँकिंग क्षेत्र मोबाईल आणि इंटरनेटद्वारे चालते. त्यामुळे बँकांना आता तंत्रज्ञान (Technology) आणि डेटा (Data) उत्तम प्रकारे हाताळू शकतील अशा तरुणांची गरज आहे.
गोल्डमन सॅक्स, जे.पी. मॉर्गन आणि बार्कलेज सारख्या जागतिक बँका भारतात आपला विस्तार करत आहेत. या केंद्रांमधून जगातील बँकिंग ऑपरेशन्स, जोखीम व्यवस्थापन आणि ग्राहक सेवा सांभाळली जाते. यासाठी भारतातून मोठ्या प्रमाणावर भरती केली जात आहे.
आजकाल सामान्य लोक केवळ बँकेत पैसे न ठेवता शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत. ही गुंतवणूक हाताळण्यासाठी आणि लोकांना सल्ला देण्यासाठी बँकांना हुशार 'सल्लागारांची' गरज आहे. याचे उदाहरण आयआयएम (IIM) इंदूरच्या प्लेसमेंटवरून लक्षात येते. येथे २०२४ च्या बॅचच्या केवळ १९ टक्के विद्यार्थ्यांना फायनान्समध्ये नोकरी मिळाली. तर मागील वर्षीच्या बॅचमधील १४.५ टक्के विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. तर २०२६ ची बॅच (आत्तापर्यंत): तब्बल २१ टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र पूर्वीसारखे केवळ लिपिक काम करणारे कर्मचारी बँकांना नको आहेत. तर तंत्रज्ञान जाणणारे, गुंतवणुकीचा सल्ला देणारे आणि जोखीम ओळखणारे तज्ज्ञ हवे आहेत. यामुळेच आयटी आणि मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी बँकिंग हे आता सर्वात पसंतीचे क्षेत्र बनत असल्याचे चित्र आहे.