पणजी; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच गोव्यातील हरवळे येथे रूद्रेश्वराचे दर्शन घेतले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विचारले असता ते म्हणाले की, 'आप'वाल्यांना आता देव आठवू लागला असून केजरीवाल यांना जरी साखळीतून निवडणूक लढवायची इच्छा असेल तर त्यांचे स्वागतच करू, अशा शब्दांत केजरीवाल यांच्या देवदर्शन उपक्रमाचा समाचार घेतला.
ते पुढे म्हणाले की, आपण दर सोमवारी रूद्रेश्वराचे दर्शन घेतो. निवडणुकीच्या निमित्ताने आपच्या नेत्यांना आता देव आठवू लागला आहे, ही चांगली गोष्ट आहे.
खाण अवलंबितांचे नेते पुती गावकर यांनी साखळीतून निवडणूक लढविण्याची भूमिका जाहीर केली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, की कोणालाही निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. राज्यातील खाणी पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी कटिबध्द आहोत. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात सत्ता स्थापन केल्यास ३०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल असे आश्वासन याआधी दिले होते.