चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शेतात निंदन काढत असताना वीज पडून एक महिला ठार तर दोन महिला जखमी झाल्याची घटना आज रविवारी (दि. १ ऑक्टोबर) रोजी मुल तालुक्यातील चिचाळा शेतशिवारात बाराच्या सुमारास घडली. चंद्रकला संजय वैरागडे (वय ४५) असे मृत महिलेचे नाव असून जखमीमध्ये आशा रविंद्र बुरांडे आणि वंदना मनोज वासेकर यांचा समावेश आहे. जखमींना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
संबधित बातम्या
आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होवून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. अर्धा तासांपर्यंत विजांचा कडकडाट सुरू होता. दरम्यान तालुक्यातील चिचाळा कवडपेठ मार्गावर असलेल्या चंद्रकला संजय वैरागडे यांच्या शेतात सात महिला धान पीकाचे निंदन काढण्याचे काम करीत होत्या. बारा वाजण्याच्या सुमारास विज कोसळून त्यापैकी चंद्रकला वैरागडे जागीच मृत्यू झाला. तर आशा रविंद्र बुरांडे आणि वंदना मनोज वासेकर या दोन महिला घटनेत जखमी झाल्या. अन्य महिला बचावल्या.
जखमी झालेल्या महिलांना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चंद्रकला संजय वैरागडे या अल्पभूधारक शेतकरी होत्या. या घटनेमुळे चिचाळा गावात हळहळ व्यक्त केले जात आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांना आणि जखमी महिलांच्या कुटुंबीयांना तात्काळ शासकीय मदत मिळावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
हेही वाचा :