अतिवृष्टीमुळे चेंबूर येथे दरड कोसळलेल्या दुर्घटनाग्रस्त भागाला पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्थानिकांशी त्यांनी संवाद साधला.
अतिवृष्टीमुळे चेंबूर येथे दरड कोसळलेल्या दुर्घटनाग्रस्त भागाला पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्थानिकांशी त्यांनी संवाद साधला.

आदित्य ठाकरे : मुंबईत अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे दुर्दैवी

Published on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: आदित्य ठाकरे : मुंबईत अतिवृष्टीमुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप आदी ठिकाणी काही घरांवर दरड कोसळणे दुर्दैवी आहे. धोकादायक ठिकाणांतील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करावे, अशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या.

अधिक वाचा:

दरड कोसळण्याची माहिती मिळताच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी रात्रीच प्रशासनाकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली.

तसेच दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांसाठी तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले.

या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर जखमींवर विविध रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्तीच्या अशा प्रसंगी राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन दुर्घटनाग्रस्तांना दिलासा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

अधिक वाचा:

दुर्घटनांची माहिती मिळताच पालकमंत्री ठाकरे यांनी चेंबूरमधील भारतनगर, विक्रोळी येथील सूर्यानगर, भांडुपमधील मुन्शी महल परिसर येथील घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला.

जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. या दुर्घटनेत मुत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

तसेच परिसरातील रहिवाशांची भेट घेऊन त्यांनी शासनामार्फत सर्व त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार रमेश कोरगावकर, सुनील राऊत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे,

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर, स्थानिक नगरसेवक उमेश माने, निधी शिंदे, राजेश्वरी रेडकर, दीपमाला बडे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

अधिक वाचा:

मिठी नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर

ठाकरे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, 'रात्रीतून २०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवली. दुर्घटनास्थळी पोहोचणे कठीण असतानाही बचाव पथकांनी अनेक अडचणींचा सामना करीत मदतकार्य सुरू केले आहे.

दुर्घटनास्थळी धोकादायक अवस्थेत असलेल्या घरांचे इतरत्र स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मिठी नदीची पातळी वाढल्याने तेथेही किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.

अधिक वाचा:

कमी वेळेत अधिक पाऊस पडत असल्याने मुंबईत ज्या ठिकाणी पाणी साचून समस्या निर्माण होतात तेथे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यावर भर दिला जात आहे. यासाठी पाणी साठवणाऱ्या मोठ्या भूमिगत टाक्या बांधल्या जात आहेत.'

हवामान विभागाने मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हे लक्षात घेता रहिवाशांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.

हेही वाचलेत का: 

पहा व्हिडिओ:  २०० वर्षे जुन्या घरांचं मुबंईतील गाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news