

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवरा नेहमी रात्री उशिरा घरी येत असेल आणि त्यामुळे बायको त्याच्या चारित्र्यावर संशय घेत असेल तर तो छळ म्हणता येणार नाही, असे छत्तीसगड उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि दीपक कुमार तिवारी यांनी हा निकाल दिला आहे. अशा परिस्थितीत बायकोची ही नैसर्गिक वर्तणूक म्हणावी लागेल, असे न्यायमूर्तींनी म्हटले आहे. (Wife doubting husband)
न्यायमूर्ती म्हणाले, "ही सामान्य वर्तणूक म्हणावी लागेल. जर नवरा नेहमीच रात्री उशिरा घरी येत असेल तर बायकोच्या मनात शंका येणार आणि ती शंका तिने व्यक्त केली तर त्याला छळ म्हणता येणार नाही." १६ ऑक्टोबरला न्यायालयाने हा निकाल दिला आहे. बार अँड बेंच या वेबसाईटने ही बातमी दिली आहे. (Wife doubting husband)
नवरा नेहमी रात्री घरी उशिरा येतो आणि काही वेळा तर घरी येतच नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले होते. मी राजकारणात आहे, त्यामुळे रात्री घरी येण्यास उशीर होतो, पण बायको माझ्या चारित्र्यावर शंका घेऊन माझा छळ करते, असे नवऱ्याने म्हटले होते.
नवऱ्याच्या याच दाव्यावर कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटला मंजुरी दिली होती. पण बायकोने या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यालायाने म्हटले आहे की, जर नवऱ्याने त्याच्या वर्तणुकीबद्दल योग्य स्पष्टीकरण दिले असते, तर बायकोच्या मनात शंका आली नसती. या याचिकेत नवऱ्याने बायकोच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला होता, यावर न्यायालयाने जोडीदाराने एकमेकांवर विश्वास ठेवावा, असे सूचना केली आहे. न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा निकाल रद्द केला.
हेही वाचा