सांगोला : पुढारी वृत्तसेवा धनगर समाजातील युवकांनी संघटित होऊन चांगल्या पदाची नोकरी व्यवसायात नावलौकिक मिळवावा. गावागावात संघटना निर्माण करून संघटित व्हावे. धनगर समाजाने एकत्र येणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन संमेलन अध्यक्ष डॉ. आर. एस. चोपडे यांनी केले. अहिल्यादेवी होळकर सभागृहात स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख आदिवासी धनगर साहित्य संमेलन उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून डॉ. चोपडे बोलत होते. व्यासपीठावर तहसीलदार अभिजीत पाटील, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, रतनबाई देशमुख, चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी नगराध्यक्ष राणीताई माने, डॉ. शिवाजी ढोबळे, अभिमन्यू टकले, संजय शिंगाडे आदी उपस्थित होते.
डॉ. चोपडे पुढे म्हणाले की, धनगर समाजाला अद्यापपर्यंत आरक्षण मिळाले नाही. मात्र, धनगड यांना कायद्याने आरक्षण आहे. धनगड व धनगर हे एकच आहेत. ही सध्या कायदेशीर बाब चालू आहे.धनगर समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे. वैचारिक बैठक झाली पाहिजे. तरुण आणि कष्ट व एकीच्या बळावर आपल्या व्यवसायात प्रावीण्य मिळवले पाहिजे व अभ्यास व जिज्ञासा ठेवून उच्च पदावर नोकरी मिळवली पाहिजे. या संमेलनामधून युवकांनी प्रेरणा घेऊन धनगर समाज एकत्र आणला पाहिजे. टेंभू उपसा सिंचन योजनेला स्वर्गीय मा. आमदार गणपतराव देशमुख यांचे नाव द्यावे, असा एकमुखी ठराव करण्यात आला.