जळगाव : चिंचेचे झाड कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : अमळनेर तालुक्यातील अंचलवाडी येथे वादळामुळे झोपडीवर चिंचेचे झाड कोसळून दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल दि. १६ रोजी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. ज्योती बल्लू बारेला (वय १६) आणि रोशनी बल्लू बारेला (वय १०) अशी बहिणींची नावे आहेत.

वाचा – नाशिक : सिडकोत अज्ञात समाजकंटकांनी सात कारच्या काचा फोडल्या

वडील बल्लू बारेला हे तालुक्यातील रणाई येथील रहिवासी आहेत. शेतात सालदारकी करत असल्यामुळे बल्लू हे अंचलवाडी गावातील खळवाडीत चिंचेच्या झाडाखाली वास्तव्याला होते. आज दुपारी वादळाचा तडाखा सुरू झाल्याने अचानक जोरात वादळ-वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. याचवेळी काही कळण्याच्या आत खळ्यात असलेले चिंचेचे झाड झोपडीवर कोसळले. त्यात बल्लू बारेला यांच्या दोन मुली ज्योती बारेला आणि रोशनी बारेला या दोन्ही बहिणी झाडाखाली दाबल्या जाऊन त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर गावातील सरपंच भगवान पाटील, रंगराव पाटील, गोपाळ पाटील यांच्यासह इतर ग्रामस्थ व तरुण मदतीला धावून आले. झाडाखाली संपूर्ण झोपडी दाबली गेल्याने झाड कापून मुलींचे मृतदेह व साहित्य बाहेर काढण्यात आले.

आई-वडील शेतात गेले होते कामाला

ज्योती आणि रोशनी यांचे वडील बल्लू बारेला हे अमळनेर तालुक्यातील रणाईचे गावातील रहिवासी आहेत. राजेंद्र भीमराव पाटील यांच्या शेतात सालदारकी करतात. बल्लू यांनी राहण्यासाठी अंचलवाडी गावाबाहेर खळ्यात चिंचेच्या झाडाजवळ झोपडी बांधलेली होती.

ही घटना घडली तेव्हा बारेला दाम्पत्य हे दररोजप्रमाणे शेतात कामाला गेलेले होते. ज्योती आणि तिची लहान बहीण रोशनी घरी होत्या. चिंचेचे झाड झोपडीवर कोसळल्याने दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत संपूर्ण झोपडी दाबली जाऊन झोपडीतील साहित्याचे नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news