अजिंठा : पुढारी वृत्तसेवा सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी शिवारात (बुधवार) रात्री बिबट्याने हल्ला केला. गोठ्यातील दोन शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झा्ल्याचे आज (गुरुवार) सकाळी उघडकीस आले. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी, मजूर व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. पिंपळदरी शिवारातील ही चाौथी घटना असल्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.
पिंपळदरी गावाजवळील अल्पभूधारक शेतकरी शांताबाई काळे यांच्या मळ्यातील गोठ्यात शेळ्या बांधल्या हाेत्या. (बुधवार) रात्री बिबट्याने हल्ल्या करीत दोन शेळ्यांना ठार केले. शांताबाई काळे यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती वनविभाग देण्यात आली.
बिबट्याच्या हल्ल्याची ही गावातील चौथी घटना असून, या आधी अर्जुन गव्हाणे या शेतकऱ्याच्या बिबट्याने ९ शेळ्या ठार केल्या होत्या. त्या नंतर हिम्मतराव गायकवाड यांच्या दोन शेळ्या आणि लक्षमण कळावत्रे या शेतकऱ्याच्या पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याने दोन शेळ्या ठार केल्या होत्या. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. ग्रामस्थांनी व परीसरातील शेतकरी बांधवांनी संतप्त होत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे केली आहे.