पैठण; पुढारी वृत्तसेवा : जायकवाडी नाथसागर प्रकल्पात होत असलेली पाण्याची आवक लक्षात घेता आज (दि.१८) धरणातील जिवंत साठा ७३.९८ टक्के इतका झाला आहे. चांगला पाऊस होत असल्याने पाणलोट क्षेत्रातील नदी, नाल्यांद्वारे नाथसागर धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने पाणीपातळी वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून गोदावरी नदीत विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, अशा सुचना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिल्या आहेत.
धरणाच्या परिचलन सुचीनुसार आवश्यक असणारे पाणीपातळीचे नियमन करावे लागते. त्यामुळे अशीच पाण्याची आवक चालू राहिल्यास कुठल्याही वेळात धरणाच्या गेटमधून सांडव्याद्वारे गोदावरी नदीमध्ये विसर्ग सुरू करावा लागणार आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठच्या दोन्ही तीरावरील लोकांनी सतर्कता बाळगावी, असा सावधनतेचा इशारा देण्यात आला आहे.
यासह शासकीय विभागाच्या संबंधित यंत्रणेने खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. यामुळे तहसीलदार दत्तात्रय निलावाड यांनी गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या गावाचे मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल यांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचलंत का ?