पेठवडगाव :
पेठवडगाव येथील आंतरराष्ट्रीय नेमबाज अभिज्ञा अशोक पाटील (मूळ गाव तळसंदे) हिने नवी दिल्लीतील जागतिक नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. महिलांच्या वरिष्ठ गटात अभिज्ञाने 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र गटातून पंजाबच्या गुरप्रीत सिंगच्या जोडीने अभिज्ञा रौप्यपदकाची मानकरी ठरली.
अंतिम फेरीत भारताच्या टीम क्रमांक 2 मधून अभिज्ञा आणि गुरप्रीत सिंग (पंजाब) हे दोन खेळाडू सहभागी होते तर भारताच्याच टीम क्रमांक एकमध्ये तेजस्विनी (हरियाणा) आणि विजयवीर सिद्धू (पंजाब) या दोन खेळाडूंची निवड केलेली होती. अंतिम फेरीत अभिज्ञा आणि गुरप्रीत सिंग यांना रौप्यपदक मिळाले
भारताचा विजयवीर सिद्धू आणि तेजस्विनी यांनी आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र गटात सुवर्णपदक मिळवले. या प्रकारातील अंतिम सामना दोन भारतीय जोड्यांमध्ये राहिला. विजयवीर आणि तेजस्विनी जोडीने गुरप्रित सिंह व अभिज्ञा पाटील जोडीला 9-1 असे पराभूत केले.
पात्रता फेरीत गुरप्रीत आणि अभिज्ञा हे 370 गुणांसह अव्वल स्थानी होते. तर, तेजस्विनी व विजयवीर 368 गुणांसह दुसर्या स्थानावर होते. यापूर्वी शुक्रवारी विजयवीरने अनीश भानवाला आणि गुरप्रीत सारख्या भारतीय नेमबाजाना मागे टाकत 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत वैयक्तिक रौप्यपदक मिळवले. भारतीय संघ 13 सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य पदकासह एकूण 27 पदकांची कमाई केली व अव्वल स्थानी कायम आहे.