कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
जूनच्या दुसर्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 600 कोटींचे अर्थसहाय्य करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा हवेत विरली असून, अद्यापही निधी एस.टी. प्रशासनाकडे वर्ग झालेला नाही. त्यामुळे एस.टी. कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. कोल्हापूर विभागातील सुमारे 5 हजार एस.टी. कर्मचार्यांचा यात समावेश आहे.
राज्यातील कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे एस.टी.ची प्रवासी वाहतूक बंद होती. एस.टी.च्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाल्याने कर्मचार्यांच्या वेतनाचा पेच निर्माण झाला आहे. रखडलेल्या मे महिन्याच्या वेतनासाठी उपमुख्यमंत्री पवार व परिवहनमंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत अधिकार्यांची बैठक पार पडली. या बैठकीत वेतनासाठी सुमारे 600 कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अद्यापही कर्मचार्यांना वेतनाची प्रतीक्षा कायम आहे. एस.टी. कर्मचार्यांचे वेतन दर महिन्याच्या 7 तारखेपर्यंत बँक खात्यात वर्ग होते. मात्र, जूनची 21 तारीख येऊनही वेतन झाले नसल्याने एस.टी. कर्मचारी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाकडून वेतनास विलंब होत असल्याने कर्मचार्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. दरम्यान, एस.टी. कर्मचार्यांच्या वेतनासाठी पुढील सहा महिन्यांकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी कामगार संघटनांनी केली आहे.