पाचोड, पुढारी वृत्तसेवा : हैद्राबाद येथे एमबीबीएस वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी रेल्वेतून प्रवास करताना एका विद्यार्थिनीची बॅग चोरट्यांनी पळविली. या बॅगेत प्रवेशासाठी लागणारी महत्त्वाची मूळ कागदपत्रे, ४० हजार रुपये चोरीला गेल्याने आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याने त्या विद्यार्थिनीला मानसिक धक्का बसला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रांजनगाव दांडगा (ता. पैठण जि. औरंगाबाद) येथील अल्ताफ पटेल यांची औरंगाबाद हर्रसुल भागात राहणारी भाची अक्सा अनिस शेख (वय १९) हिचा हैद्राबादेतील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एसबीबीएसच्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी नंबर लागला होता. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ती वडील अनिस, मामा यांच्यासोबत १७ मार्च रोजी संध्याकाळी हैदराबादला निघाली होती.
ते तिघेजण औरंगाबाद येथील रेल्वे स्टेशनवरुन अजंठा एक्सप्रेसने हैद्राबादकडे निघाले. दरम्यान, पहाटे त्यांना झोप लागल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी बॅग पळविली. हैद्राबाद येथील सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर रेल्वे थांबल्यानंतर ते तिघेजण झोपेतून जागे झाल्यानंतर त्यांना बॅग चोरीला गेल्याचे समजले.
त्या सर्वांनी इतरत्र बॅगची शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु बॅग आढळून आली नाही. त्यानंतर त्यांनी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दरम्यान, ४० हजारांसह प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे लंपास झाल्याने त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाविना परत यावे लागले. आता शैक्षणिक प्रमाणपत्रांची दुसरी प्रत हातात येईपर्यंत बराच विलंब लागणार आहे. त्यामुळे अक्शाला प्रवेशाबाबत चिंता सतावू लागली आहे.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : 'झुंड' मधून नागराज मंजुळेंना नेमकं काय सांगायचं आहे ? : नागराज मंजुळेंशी खास गप्पा | jhund movie