मुंबई : पुढारी ऑनलाईन
मराठा आरक्षण फूलप्रूफ नव्हते यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केल्याने आणि भाजपचा भांडाफोड झाल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नैराश्यात गेले आहेत. त्यामुळे त्यांना मानसिक उपचारांची गरज आहे, अशी बोचरी टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
सत्ता गेल्याचे नैराश्य, पुन्हा सत्ता मिळत नसल्याची हतबलता आणि मराठा आरक्षणाच्या 'फुलप्रुफ'तेचा सर्वोच्च न्यायालयात भंडाफोड पाटील बेताल बोलत आहेत, असेही ते म्हणाले. मराठा समाजासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा, अशी मागणी करताना चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्याचा संदर्भ देत चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे.
वाचा : मंत्री जयंत पाटलांच्या नाराजीने ताणाताणी
भाजपला सत्ता गेल्याचे नैराश्य होतेच. सतत तारखा देऊन महाविकास आघाडी सरकार अस्थिर होत नसल्याने हतबलताही आली आहे. मराठा आरक्षणाबाबत भाजपने खोटे दावे केले होते. त्याचा सर्वोच्च न्यायालयानेच भंडाफोड केल्याने चंद्रकांत पाटील सैरभैर झाले आहेत. या ताणतणावामुळे नेमके काय बोलावे हे कळेनासे झाल्याने त्यांचा तोल जात आहे. योग्य मानसिक उपचारातून या समस्येवर नक्कीच मार्ग निघू शकेल, अशी टीका केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर सातत्याने टीका करत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही तातडीने सर्वोच्च न्यायालयात फेर याचिका दाखल करावी, अशी मागणी पाटील यांनी केली. मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे, मात्र ती हिंमत मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्यात नाही, अशी टीका केली. अजित पवार डायनॅमिक आहेत, त्यांनी ठरवलं तर ते घोषणा करू शकतात, असे सांगतानाच अजित पवार ते का करत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.
वाचा : कोरोनालाही जगण्याचा अधिकार; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याचे वादग्रस्त विधान