पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे सोमवारी (दि. 27) पहाटे अवकाळी पावसात वीज कोसळून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी आहे. राजेंद्र शंकर जायभाय (वय 26 वर्ष) यांचा असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे तर विष्णू नागरे, नवनाथ गीते हे किरकोळ जखमी झाले आहेत.
राजेंद्र शंकर जायभाय (वय 26 वर्ष) , विष्णू नागरे, नवनाथ गीते हे तीघेजण पीक संरक्षणासाठी शेतात आखाड्यावर होते. पहाटे अडीच वाजताच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाचा पाऊस सुरू झाला. त्यामुळे तिघेजण आसरा घेण्यासाठी बाजूलाच असलेल्या खंडोबाच्या मंदिरात गेले. दरम्यान या ठिकाणी वीज कोसळली. यावेळी राजेंद्र जायभायये यांचा जागीच मृत्यू झाला तर विष्णू नागरे, नवनाथ गीते हे जखमी झाले. माजी सभापती राजेंद्र सांगळे, चिमेगावचे पोलीस पाटील शंकर घुगे व ग्रामस्थांनी औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान पोलीस निरीक्षक जीएस राहिरे जमादार संदीप टाक यांनी भेट दिली
राजेंद्र शंकर जायभाय यांच्या पश्चात पत्नी,आई, अपंग भाऊ असा परिवार असून घरातील करता पुरूष जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महसूल प्रशासनाकडून तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी सुजाता गायकवाड तलाठी जोंधळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून शासनाकडून आर्थिक सहकार्य मिळण्यासाठी पुढील कार्यवाही करीत असल्याचे समजते.