IND vs ENG Test : टीम इंडियाने रचला इतिहास, 112 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी | पुढारी

IND vs ENG Test : टीम इंडियाने रचला इतिहास, 112 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना रोहित आणि कंपनीने एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. या विजयासह भारतीय संघाने मालिका 4-1 अशी खिशात घातली. धर्मशाला येथील पाचवी कसोटी जिंकून टीम इंडियाने एका खास विक्रमाचीही बरोबरी केली आहे. (IND vs ENG Test)

मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर रोहित आणि कंपनीने जबरदस्त पुनरागमन करत उर्वरित चार सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकली. भारताने तिसऱ्यांदा कसोटी मालिकेत चार सामने जिंकले आहेत. यापूर्वी टीम इंडियाने 2012-13 मध्ये ऑस्ट्रेलियाचा 4-0 आणि 2016-17 मध्ये इंग्लंडचा 4-1 असा पराभव केला होता.

भारतीय संघाने रचला खास विक्रम

धर्मशाला येथील पाचवी कसोटी जिंकून टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांनी केलेल्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर आतापर्यंत केवळ तीनवेळा संघानी दमदार पुनरागमन करून उर्वरित चार सामने जिंकले आहेत. (IND vs ENG 5th Test)

क्रिकेटच्या इतिहासात असे एकूण आतापर्यंत केवळ चारवेळा घडलं आहे. ऑस्ट्रेलियाने दोन वेळा तर, इंग्लंड आणि भारताने प्रत्येकी एकदा अशी कामगिरी केली आहे. 112 वर्षांपूर्वी इंग्लंडने अशी कामगिरी केली होती. 1912 मध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर इंग्लिश संघाने जबरदस्त पुनरागमन केले आणि उर्वरित चार सामने जिंकले. तर, ऑस्ट्रेलियाने 1897/98 आणि 1901/02 मध्ये ही कामगिरी केली होती.

112 वर्षांत पहिल्यांदाच टीम इंडियाने केली अशी कामगिरी

अशी कामगिरी करताना भारताने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांची बरोबरी केली आहे. पहिली कसोटी गमावल्यानंतर मालिकेतील उर्वरित चार कसोटी जिंकणारा टीम इंडिया गेल्या 112 वर्षांत पहिल्यांदा अशी कामगिरी केली आहे.

हैदराबादमधील पहिली कसोटी इंग्लंडने 28 धावांनी जिंकली. यानंतर भारताने जोरदार पुनरागमन करत विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी 106 धावांनी, राजकोटमधील तिसरी कसोटी 434 धावांनी आणि त्यानंतर रांचीमधील चौथी कसोटी पाच विकेटने जिंकली. टीम इंडियाने धर्मशाला कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपवली हाेती.  (IND vs ENG Test)

 धर्मशाला कसोटीत काय झालं?

धर्मशाला कसोटीत इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी 477 धावांवर संपला. यामुळे टीम इंडियाने 259 धावांची आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात केवळ 195 धावा करू शकला. हा सामना एक डाव आणि 64 धावांनी जिंकण्याबरोबरच भारताने मालिकाही 4-1 ने जिंकली.

भारताने 17 वी कसोटी मालिका जिंकली

भारताने घरच्‍या मैदानावर 17 वी कसोटी मालिका जिंकली आहे. हाही एक विक्रम आहे. ही विजयी खेळी 22 फेब्रुवारी 2013 पासून आत्तापर्यंत सुरू आहे. यामध्ये दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. त्यांनी 1994 ते 2001 पर्यंत मायदेशात सलग 10 कसोटी मालिका जिंकल्या होत्या.

 

हेही वाचा :

Back to top button