अबूधाबीत साकारला शनिवारवाडा; गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा
संयुक्त अरब अमिरातीतील अबूधाबी येथे शनिवारवाडा साकारत गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. परदेशी भूमीवरील माहेरचा गणपती अशी ओळख बनलेल्या महाराष्ट्र मंडळाने दोन वर्षांनी पुन्हा एकदा इंडिया सोशल सेन्टरच्या सभागृहात लाडक्या बाप्पाची स्थापन करून उत्सव साजरा केला.
गेल्या वर्षी कोरोनामुळे गणरायाचे आगमन सार्वजनिक न करता खासगीत करावे लागल्याने सभासदांना दर्शनापासून वंचित राहावे लागले होते. आबूधाबीतील मराठी मनाला यंदाही बाप्पाच्या आगमनाची आस लागली होती. संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारने कोरोना नियंत्रणासाठी केलेले प्रयत्न आणि लसीकरणच्या तिसर्या व चौथ्या डोससाठी स्थानिक रहिवाश्यांना उपलब्ध करून दिलेल्या सोयी यामुळे यंदा नियमात थोडी शिथिलता आली आणि मंडळाला काही अटींसह परवानगी मिळाली.
शनिवारवाडा साकारण्यासाठी महिनाभरापासून तयारी
महिनाभर आधीच मंडळाची समिती गणपतीच्या आगमनाची तयारी करण्यात गुंतली होती. मंडळाच्या अध्यक्षा प्रिया पाकळे यांच्या संकल्पनेतून शनिवारवाडा उभारण्यात पूर्ण कमिटी कामाला लागली होती. अक्षय फणसे, यशश्री जोशी आणि सुवर्णा देशपांडे यांच्या कुशल कामगिरीला सुशील गुरव, चिनार पाटील, अनिल पाकळे, दर्पण आणि पद्मिनी सावंत, प्रशांत मोहिते, सोनाली आणि ऊर्जा माजगावकर, सचिन अमृतकर, दीप्ती राव, निलेश आणि भूमिका उज्जैनकर यांची साथ मिळाली आणि कल्पनेतील शनिवारवाडा मूर्त स्वरूपात तयार झाला.
- मुंबईत उद्या फक्त महिलांसाठी लसीकरण; डोस विनानोंदणी घेता येणार
- गणेशमूर्तींचा विश्वविक्रमी प्रयोग फेल; महापालिका प्रशासनासह पदाधिकार्यांनाही पडला विसर
मंडळाचे विश्वस्त मंदार आपटे, प्रकाश पाटील आणि नरेंद्र कुलकर्णी यांचे मार्गदर्शन व सचिव जितेंद्र बाचल यांच्यासह सर्वांची अथक मेहनत, अपार कष्ट घेतले. त्यातून शनिवार वाडा उभा राहिला. मुख्य प्रवेशद्वारात उभी राहिलेली गणेश मूर्ती, दोन्ही बाजूचे बुरुज, त्यावर दिमाखात फडकणारा भगवा, त्याच्या बाजूला तुतारी वाजवत उभे असलेला मर्द मराठा मावळा मराठा साम्राज्याची आठवण करून देत होता.
दीप्ती आणि अजित राव यांनी गुरुजी नरेंद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बाप्पांची प्राण प्रतिष्ठा केली. गणराया समोर स्मिता सराप यांनी काढलेली रांगोळी लक्ष वेधून घेत होती. संध्याकाळी भारतीय दूतावासातील पदाधिकारी, सभासद आणि प्रमुख उद्योग व्यावसायिक, देणगीदार यांच्या उपस्थितीत आरती पार पडली. दुसर्या दिवशी सकाळी अथर्वशीर्ष आणि संध्याकाळी विसर्जन साधेपणाने पण ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत उत्साहाने पार पडला, असे महाराष्ट्र मंडळ, अबुधाबीचे प्रशांत कुलकर्णी यांनी सांगितले.