नेवाळी (ठाणे) : वार्ताहर
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात यंदा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्याला खड्डे पडले होते. आता पावसाळा संपल्यावर हे खड्डे बुजवण्यावरून नव्या वादाला सुरूवात झाली आहे.
डोंबिवली, कल्याण ते टिटवाळा परिसरातले खड्डे बुजवण्यासाठी यंदा १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या खड्डे भरणीच्या कामाची माहिती कल्याणमधील जागरूक नागरिक मंचाचे श्रीनिवास घाणेकर यांनी माहितीच्या अधिकारात मागवली. त्यावेळी शहरातील ५ हजार २८३ खड्डे बुजवण्यात आले असून त्यासाठी ठेकेदाराला ११ कोटी ९० लाख रुपये देण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. ही आकडेवारी पाहिल्यास एक खड्डा बुजवण्यासाठी तब्बल २२ हजार रुपये खर्च करण्यात आल्याची धक्कादायक बाब स्पष्ट होतेय. त्यामुळं यावरून नुकत्याच झालेल्या महासभेत मनसे आणि सत्ताधारी भाजपने सत्ताधारी शिवसेनेला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्यात एक खड्डा बुजवण्यासाठी इतके पैसे कसे लागले? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीतच आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये मात्र संतापाचं वातावरण आहे.