संत गोरोबा काका साहित्यनगरी, उस्मानाबाद : अनिल भाले
साहित्य, संस्कृती, प्रतिभेने मराठवाडा समृद्ध आहे. शाहीर अमर शेख, डॉ. जब्बार पटेल यांच्यासारखे प्रेरणा देणारे लोक इथलेच, तर भाई उद्धराव पाटील हे माझे आदर्श आहेत, अशा शब्दांत साहित्य परंपरेचा गौरव करत किती तरी दिग्गजांची मराठवाडा ही भूमी मागास कशी असा सवाल साहित्य संमेलनाचे उद्घाटक ख्यातनाम कविवर्य पद्मश्री ना. धों. महानोर यांनी उपस्थित केला.
संत गोरोबा काका साहित्यनगरीत आयोजित 93 व्या अ. भा. साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी महानोर यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आले. यावेळी मंचावर मावळत्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, अ.भा. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, अक्षयकुमार काळे, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. पी. डी. पाटील, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. या संमेलनात डॉ. ढेरे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे दिब्रिटो यांच्याकडे सुपुर्द केली. उस्मानाबादसारख्या मागास भागात साहित्य संमेलन होऊ शकते का अशी शंका अनेकांनी उपस्थित केली, परंतु गेल्या चार महिन्यांपासून साहित्यप्रेमींनी प्रयत्न करीत संमेलनाची तयारी केल्याचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी सांगितले. कोणतीही संस्कृती ही आरोळ्या देणार्यांच्या, धाक दाखवणार्यांच्या आणि बळजबरी करणार्यांच्या आक्रमकतेवर तरलेली नसते असे मत अरुणा ढेरे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
महानोर म्हणाले, की साहित्यात निकोप पद्धतीने अध्यक्ष निवडण्याची प्रथा ही ऐतिहासिक आहे. हा पायंडा उस्मानाबादच्या संमेलनात सुरू झाला. मुळात अध्यक्षांची निवड साहित्याचा निकष लावून करणे हे योग्य आहे. मराठी साहित्याला उंचीवर नेण्याचे कार्य फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले. यापूर्वी लक्ष्मीबाई टिळकांनीही आपल्या साहित्याने वेगळ्या उंचीवर नेले. तीच परंपरा आज फादर दिब्रिटोंच्या रूपाने पुढे नेली जात आहे. साहित्यिकाची जात ही तर उच्च साहित्य आहे. माणूस हाच सर्वोच्च धर्म आहे. हे सांस्कृतिक मोठेपण असताना एक अमराठी साहित्यिक विशेषतः ख्रिश्चन अध्यक्ष होणे हे विलक्षण आहे.