…असा पार पडला होता यवतमाळमध्ये पहिला समलिंगी विवाह! | पुढारी

...असा पार पडला होता यवतमाळमध्ये पहिला समलिंगी विवाह!

पुढारी ऑनलाईन डेस्क

एलजीबीटी वर्गासाठीच्या मानसन्मानासाठी दरवर्षी जून महिना हा ‘प्राईड मंथ’ नावाने साजरा केला जातो. त्या निमित्ताने २ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये पहिला समलिंगी विवाह झाला होता. हा समलिंगी विवाह पार पडताना नेमक्या कोणत्या अडचणी आल्या, त्या समलिंगी व्यक्ती कोण होत्या, घरातील सदस्यांचा प्रतिक्रिया कशा होत्या, पाहूया सविस्तर…

यवतमाळमध्ये पहिला समलिंगी विवाह पार पडला. अमेरिकेत स्थायिक झालेल्या यवतमाळ शहरातील एका प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या मुलाने विदेशातील आपल्या समलैंगिक मित्रासोबत चक्क लग्न केलं आणि यवतमाळ बातम्यांच्या गर्दीमध्ये आघाडीवर आलं. शहरात जिकडे-तिकडे चर्चाच चर्चा रंगली. या लग्नाला घरातील लोकांचा… प्रामुख्याने वराच्या आईचा विरोध होता. म्हणून मर्यादित लोकांच्या उपस्थितीत विवाह पार पडला. 

यवतमाळमध्ये प्रसिद्ध पुस्तक व्यावसायिक आहेत, त्यांचा मुलगा अमेरिकेत एका गलेलठ्ठ पगारावर नोकरी करत होता, त्याच्याशी लग्न लावायला अनेक मुलींचे पालक आणि मुलीदेखील लग्नासाठी तयार होत्या. घरातील सदस्य अनेक मुलींचं स्थळ घेऊन आले. पण, तो प्रत्येक वेळी नकार देत राहिला. शेवटी घरातील लोकांनी त्याच्या नकारामागचं कारण विचारलं. त्यानं स्पष्ट सांगितलं की, “मी समलिंगी लग्न करणार आहे.” 

मुलाच्या या उत्तराने घरातील लोकांना धक्काच बसला, ते नाराज झाले. मुलाची प्रचंड संतापली आणि तिने कडाडून विरोध करायला सुरूवात केली. लग्नाच्या क्षणापर्यंत आईचा विरोध सुरूच होता. या लग्नामध्ये वर म्हणजेच नवरा मुलगा हा यवतमाळमधला होता, तर त्याचा जोडीदार म्हणून नवरी किंवा वधू ही चिनी होता. अखरे दोघांचा विवाह ३० डिसेंबर २०१७ रोजी यवतमाळ शहरातील स्टेट बॅंक चौकात असणाऱ्या एका हाॅटेलमध्ये पार पडला. 

तुम्हाला आश्चर्य वाटेल, भारतीय समाजिक परंपरेनुसार सर्व विधी करत हा विवाह पार पडला होता. लग्नापूर्वी दोघांनाही हळद लावण्यात आली होती. लग्नाचे कपडे, वेडिंग रिंग, फुलांचा हार, सर्व काही आणण्यात आलं होतं. वैदिक मंत्रांच्या उच्चारात धुमधडाक्यात हा समलिंगी विवाह पार पडला. या लग्नामध्ये अमेरिका आणि चीनमधून ५० मित्र हजर होते. त्यात १० समलिंगी जोडपी होती. लग्नानंतर हे दोघांनी आपला हनीमूनदेखील साजरा केली. असा पार पडला पहिला समलिंगी विवाह, ज्याची चर्चा अख्ख्या राज्यात आणि देशात झाली होती. 

Back to top button