डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या 14 गावांना देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच या गावांसाठी नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणार आहे. हे काम लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याने या गावांतील पाणी समस्या येत्या काही दिवसांतच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. हा प्रश्न धसास लावण्यासाठी आमदार राजू पाटील यांनी शासनाकडे तगादा लावला होता.
कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी ग्रामस्थांना लवकरात लवकर मुबलक पाणी कसे मिळेल याकडे आमदार पाटील यांनी जातीने लक्ष केंद्रित केले होते. शुक्रवारी आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारासह 14 गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची प्रत्यक्ष कामांची पाहणी केली. हे काम आता जवळजवळ पूर्णत्वास जाणार असल्याचे पाहणी दौऱ्यादरम्यान स्पष्ट झाले. नागाव, दहिसर, भंडार्ली, आदी गावांमधील पाणी पुरवठा योजनेची माहिती घेतल्यानंतर आमदार राजू पाटील यांनी तेथिल गावकऱ्यांशी चर्चा केली.
नावाळी रुग्णालयाचाही होणार कायापालट
नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट असताना याच 14 गावांसाठी आरोग्य केंद्र सुरु करण्यात आले होते. तथापी नवी मुंबई महापालिकेतून ही गावे वगळल्यानंतर तेथील रुग्णालयाची जोपासना झाली नाही. त्यामुळे आता ही वास्तू धूळखात पडली आहे. त्यामुळे या वास्तूच्या नव्याने निर्मितीसाठी आणि तांत्रिक बाबी दूर करण्याकरिता ग्रामस्थांसह आमदार राजू पाटील यांनी शुक्रवारी या रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी 14 गाव सर्व पक्षीय विकास समिती अध्यक्ष लक्ष्मण पाटील, प्रदीप मोकाशी, मोतीराम गोंधळी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते.