जयंत पाटील : आमचे मंत्री तुरुंगात गेल्याने सरकार पडणार नाही | पुढारी

जयंत पाटील : आमचे मंत्री तुरुंगात गेल्याने सरकार पडणार नाही

बार्शी : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजप सुडाने पेटले आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला. मंत्री नवाब मलिक यांनी भाजपच्या काही भानगडी बाहेर काढल्यानेच त्यांच्यावर ईडीमार्फत कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करण्यात आली, असे ते म्हणाले. पण, आमचे मंत्री तुरुंगात गेले म्हणून सरकार पडणार नाही. आमदार ठाम असून, बहुमत स्पष्ट आहे, असा दावा त्यांनी केला.

राष्ट्रवादीच्या जनसंवाद यात्रेनिमित्त पाटील सोलापूर जिल्हा दौर्‍यावर असून, ते बार्शी येथे बोलत होते. मलिक यांच्यावर कारवाईबाबत विचारले असता ते म्हणाले, मनात आकस धरून पहाटे सहा वाजता राज्याच्या एका ज्येष्ठ नेत्याला चौकशीच्या निमित्ताने उचलून नेले जाते हे किती कायद्याला धरून आहे? याबाबत विचारता तुम्ही न्यायालयात दाद मागा असे सांगितले जाते; पण गुणवत्तेवर आधारित बाबींना तोंड देण्यास नवाब मलिक समर्थ आहेत.

पाटील म्हणाले, कोणतेही ठोस कारण नसताना आज अनिल देशमुख तुरुंगात आहेत. गुन्हा सिद्ध झाल्यास शिक्षा होण्यास काही हरकत नाही; पण अनिल देशमुख आणि आता नवाब मलिक यांच्यावर ईडीमार्फत भाजपच कारवाई करीत आहे. नवाब मलिकांना कशासाठी ईडी घेऊन गेली हे भाजपा नेत्यांना माहीत आहे. यापूर्वीही कारवाईत छगन भुजबळ हे निर्दोष झाले. मात्र, त्यांचा जो काळ जेलमध्ये गेला त्याला जबाबदार कोण? आताही राज्य सरकार पाडण्यासाठी वाट्टेल ते हातखंडे अवलंबत आहे; पण आमचे मंत्री तुरुंगात गेल्यामुळे सरकार पडेल, हा भाजपचा गोड गैसमज आहे. बहुमताएवढे आमदार आमच्या मागे असल्यामुळे सरकार पडणे शक्य नाही.

शासकीय यंत्रणा भाजपचे प्रवक्‍ते

जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकार पडेल आणि पुन्हा आपण सत्तेवर येऊ हे भाजपचे दिवास्वप्न ठरत आहे. त्यामुळे सूडबुद्धीने भाजपप्रणित केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांमार्फत सरकारच्या मंत्र्यांवर कारवाई करीत आहे. ईडी, आयटी आदी शासकीय यंत्रणांमार्फत त्यांच्या प्रवक्‍ते बनल्याचे दिसून येत आहे. कोणावर कधी व काय कारवाई होणार, हे ईडीच्या अगोदरच भाजप नेते जाहीर करतात. यावरूनच ईडी भाजप चालवते हे स्पष्ट आहे.

Back to top button