

Vaibhav Sooryavanshi Team India: भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एका नव्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, ते नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी. अवघ्या 15 व्या वर्षी आपल्या आक्रमक फलंदाजीने या तरुणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या प्रतिभेने केवळ चाहत्यांनाच नाही, तर क्रिकेटमधील दिग्गजांनाही प्रभावित केले असून, आता त्याला टीम इंडियात स्थान देण्याची मागणी होत आहे.
वैभवच्या या वेगवान खेळामागे त्याची सातत्यपूर्ण कामगिरी आणि आत्मविश्वास आहे. त्याचे कोच मनीष ओझा यांनी स्पष्टपणे सांगितले की, “वैभवने आता टेकऑफ घेतला आहे आणि त्याला टीम इंडियात आणण्याची वेळ आली आहे.” त्यांच्या मते, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आता अधिक वाट पाहू नये आणि आगामी मालिकांमध्ये त्याला संधी द्यावी.
वैभव टीम इंडियात आला, तर तो कोणाच्या जागी खेळणार हा प्रश्नही उपस्थित होत आहे. यावर उत्तर देताना मनीष ओझा यांनी स्पष्ट सांगितले की, “मोठे खेळाडू कोणाची जागा घेत नाहीत, ते स्वतःची जागा निर्माण करतात.” त्यांनी उदाहरण देत सांगितले की, राजस्थान रॉयल्समध्ये वैभवने स्वतःच्या कामगिरीच्या जोरावर स्थान मिळवले आहे.
संघरचनेच्या दृष्टीने पाहता ओपनिंग स्लॉटमध्ये स्पर्धा अधिक आहे. यावर बोलताना ओझा यांनी अभिषेक शर्माचे नाव घेतले. त्यांच्या मते, अभिषेकच्या अस्थिर कामगिरीमुळे वैभवला संधी मिळू शकते. त्यांनी सुचवले की, वैभवने संजू सॅमसन किंवा इशान किशन यांच्यासोबत ओपनिंग करावी.
कोच मनीष ओझा यांनी आणखी एक मोठा दावा करत सांगितले की, IPL 2026 नंतर होणाऱ्या प्रत्येक T20 मालिकेत वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी खेळताना दिसू शकतो. त्यांच्या मते, आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतून त्याची सुरुवात होऊ शकते आणि त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यातही तो संघाचा भाग असेल.