

Who Is Sharfuddoula Saikat: एकीकडे बांग्लादेश क्रिकेट बोर्ड भारतातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतात येण्यास टाळाटाळ करत आहे, तर दुसरीकडे भारत–न्यूझीलंडदरम्यान सुरू असलेल्या वनडे मालिकेत बांग्लादेशचे अंपायर शरफुद्दौला सैकत मैदानावर दिसत आहेत. यामुळे क्रिकेट विश्वात प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत की, जर बांग्लादेशी अंपायर भारतात सुरक्षित असतील, तर मग खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा का उपस्थित केला जातोय?
या वादानंतर बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण दिले आहे. शरफुद्दौला सैकत हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) करारबद्ध अंपायर असून, त्यांचा बांग्लादेश क्रिकेट बोर्डाशी थेट संबंध नाही, असे त्यांनी सांगितले.
शरफुद्दौला सैकत हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवी अंपायर आहेत. आतापर्यंत त्यांनी 250 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केली आहे. वडोदऱ्यात झालेल्या भारत–न्यूझीलंड पहिल्या वनडे सामन्यात त्यांनी टीव्ही अंपायर म्हणून काम केले.
16 ऑक्टोबर 1976 रोजी ढाकामध्ये जन्मलेले शरफुद्दौला हे अंपायरिंगपूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत. ते डावखुरे फलंदाज आणि स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स गोलंदाज होते. त्यांनी खेळलेल्या 10 प्रथम श्रेणी सामन्यांत 31 विकेट्स घेतल्या आहेत.
अंपायरिंगच्या कारकिर्दीत त्यांनी
32 कसोटी सामने
119 एकदिवसीय सामने
75 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने
यामध्ये मैदानावर तसेच टीव्ही अंपायर म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी महिला क्रिकेटमध्येही 17 महिला वनडे आणि 28 महिला टी-20 सामन्यांत अंपायरिंग केली आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) संकेत दिले आहेत की भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी बांग्लादेशने केलेली ठिकाण बदलाची मागणी स्वीकारली जाण्याची शक्यता कमी आहे. आयसीसीच्या अहवालानुसार, बांग्लादेश संघाला भारतात कोणताही थेट किंवा गंभीर धोका नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण वादाची सुरुवात आयपीएलमधील एका निर्णयामुळे झाली. आयपीएल लिलावात कोट्यवधी रुपयांना विकत घेतलेले मुस्ताफिजुर रहमान यांना कोलकाता नाईट रायडर्स संघातून सरकारी आदेशानुसार वगळण्यात आले. यानंतर नाराज बांग्लादेश सरकारने आपल्या देशात आयपीएलचे थेट प्रक्षेपण थांबवले आणि टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताऐवजी न्यूट्रल व्हेन्यूवर सामने खेळण्याची मागणी केली.
एकूणच, शरफुद्दौला सैकत यांच्या भारतातील अंपायरिंगमुळे बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हा मुद्दा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.