

Vaibhav Sooryavanshi Manager: वैभव सूर्यवंशी आता फक्त आयपीएल स्टार राहिला नाही तर तो आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटपूट झाला आहे. आयर्लंड आणि इंग्लंड विरूद्धच्या टी २० मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली आहे. अवघ्या १५ व्या वर्षी भारतीय संघात निवड झालेला वैभव सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक करणार आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशी सध्याच्या घडीला सर्वात जास्त टीआरपी खेचणारा खेळाडू ठरत आहे. तो आता भारताचा रायझिंग स्टार असून जवळपास १४० कोटी जनतेच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेत. मात्र हाच काळ आहेत जिथं वैभवच्या डोक्यात हवा जाऊ शकते किंवा त्याचा पाय घसरू शकतो. म्हणून भारताचा माजी खेळाडू एस श्रीसंतने त्याला मोलाचा सल्ला दिला आहे.
एस श्रीसंतने वैभव सूर्यवंशीच्या यशाबाबत बोलताना सांगितलं की वैभवच्या यशामागे त्याची कमिटमेंट, शिस्त आणि त्याच्या कुटुंबियांचा त्याग आहे.
श्रीसंत म्हणाला की, 'आपण सूर्यवंशीबाबत जेवढं बोलू तेवढं कमी आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आपण जेवढी त्याची स्तुती करू ती कमीच पडणार आहे.' श्रीसंत पुढे म्हणाला, 'मी सूर्यवंशीच्या कुटुंबियांना आणि जे सूर्यवंशीला पाहून म्हणत आहेत की मला आता असं व्हायचं आहे त्या लहान खेळाडूंना सांगू इच्छितो की, तुम्ही ते साध्य करू शकता कारण वैभवने तो मार्ग दाखवला आहे. यापूर्वी सचिन पाजींनी आपल्याला तो मार्ग दाखवला होता. त्यानंतर विराट आणि रोहित शर्माने दाखवून दिलं. मात्र वैभव हा कमिटमेंट आणि झुंजारवृत्तीचे मोठे उदाहरण आहे.'
श्रीसंतने सूर्यवंशीचा कोरोना काळातील सराव करतानाचा एक व्हिडिओ दाखवला आणि त्याच्या यशात त्यांच्या वडिलांचे आणि प्रशिक्षकांचे किती मोठे योगदान आहे हे दाखवून दिलं.
श्रीसंत म्हणाला, 'कोरोना काळात देखील तो टेरेसवर सराव करत होता. त्याच्या वडिलांविषायी खूप आदर आहे. त्याच्या सर्व प्रशिक्षकांबद्दल मला आदर आहे. कारण मी केरळचा आहे. त्यामुळं संधी मिळणं काय असतं हे मला माहिती आहे. आजही आपण क्रिकेटमध्ये संधी मिळण्याबाबत चर्चा करतो.'
'मात्र संधी मिळेल, सराव करता येईल याची शाश्वती नसताना रोज ४ तास प्रवास करणे रोज येणे रोज जाणे. फक्त ७५० ते १००० चेंडू खेळण्यासाठी हा प्रवास करणं. इतकंच काय वैभव अजूनही म्हणतो की मला आराम करत असताना चांगलं वाटत नाही.'
श्रीसंत म्हणाला की, 'मी या मुलाकडून शिकणार आहे. मी सर्व लेजंड क्रिकेटपटूंचा आदर ठेवून सांगतो की या मुलाने जे काही दाखवून दिलं आहे तो मोठा आहे. त्याला जसा आहे तसं सोडून द्या. अनेक मॅनेजर्स आता त्याच्या आसपास घोंगावत असतील.'
'वैभव जर तू हे पहात असशील तर माझी तुला विनंती आहे की तू या सर्व मॅनेजर्सना बाजूला ठेव आणि फक्त तुझ्यावर लक्ष केंद्रित कर. तुझे वडील गोष्टी मॅनेज करतील तुझे कुटंबीय सर्व मॅनेज करतील. त्यामुळं तू या व्यावसायिक मॅनेजर्सपासून दूर रहा.' असा मोलाचा सल्ला देखील एस श्रीसंतने दिला.