

India vs New Zealand T20 Stats Explained: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० क्रिकेटमधील लढती नेहमीच रोमांचक झाल्या आहेत. दोन्ही संघांमध्ये अनेकदा चुरशीचे सामने झाले असून दोन्ही संघांच्या चाहत्यांमध्ये या सामन्यांबद्दल विशेष उत्सुकता असते. विशेषतः टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांची आकडेवारी आणि आधीचे सामने यांची पुन्हा चर्चा होत आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण ३० टी-२० सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये भारताने १८ वेळा विजय मिळवला असून न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत. यापैकी दोन सामने सुपर ओव्हरमध्ये भारताच्या बाजूने गेले होते. एका सामन्याचा निकाल टाय राहिला आहे. एकूण आकडेवारीत भारताचा वरचष्मा दिसत असला तरी टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात मात्र न्यूझीलंडने भारतावर वर्चस्व राखले आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळले गेले आहेत आणि या तिन्ही सामन्यांत न्यूझीलंडने भारताला पराभूत केले आहे. त्यामुळे विश्वचषकातील अंतिम सामन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एक संस्मरणीय टी-२० सामना झाला होता. १ फेब्रुवारी २०२३ रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा तब्बल १६८ धावांनी पराभव केला होता. हा विजय टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धावांच्या फरकाने भारताचा सर्वात मोठा विजय झाला होता.
या सामन्यात शुभमन गिलने अप्रतिम फलंदाजी करत नाबाद १२६ धावांची खेळी केली होती. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारताने मोठा स्कोअर उभारला आणि न्यूझीलंडला एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला.
न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सूर्यकुमार यादव अव्वल स्थानावर आहे. त्याने १३ सामन्यांमध्ये एकूण ५२६ धावा केल्या आहेत. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्ध अनेक महत्त्वाचे सामने खेळले आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध ५११ धावा केल्या असून अनेक सामन्यांमध्ये संघाला दमदार सुरुवात करून दिली आहे. दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीमुळे भारताने न्यूझीलंडविरुद्ध अनेक सामने जिंकले आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० सामने नेहमीच उत्सुकता वाढवणारे असतात. एकीकडे भारताची मजबूत फलंदाजी आणि आक्रमक शैली तर दुसरीकडे न्यूझीलंडची शिस्तबद्ध गोलंदाजी आणि रणनीती यामुळे या दोन संघांमधील सामने चुरशीचे होतात.
एकूण आकडेवारीत भारत आघाडीवर असला तरी विश्वचषकात न्यूझीलंडचा वरचष्मा राहिल्याने यावेळच्या अंतिम सान्याला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अंतिम सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड: टी-२० आकडेवारी
एकूण सामने: ३०
भारत विजयी: १८ (यात दोन सुपर ओव्हरमधील विजयांचा समावेश आहे)
न्यूझीलंड विजयी: ११
टाय (Tied): १
टी-२० विश्वचषक रेकॉर्ड: विश्वचषकात आतापर्यंत ३ सामने झाले असून तिन्ही वेळा न्यूझीलंडने विजय मिळवला आहे
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथील रेकॉर्ड
भारत आणि न्यूझीलंड या स्टेडियमवर १ फेब्रुवारी २०२३ रोजी आमनेसामने आले होते.
निकाल: भारताने हा सामना १६८ धावांनी जिंकला होता, जो टी-२० इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा सर्वात मोठा विजय आहे.
हायलाइट्स: शुभमन गिलने नाबाद १२६ धावा फटकावल्या होत्या.
न्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी सर्वाधिक धावा (Top Scorer)
सूर्यकुमार यादव: त्याने न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक ५२६ धावा केल्या आहेत (१३ सामन्यांत)
रोहित शर्मा: त्याने ५११ धावांसह या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.
एका डावातील सर्वोच्च धावसंख्या: शुभमन गिल (१२६ नाबाद, अहमदाबाद २०२३)