

India Playing XI T20 World Cup Final: टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनबाबत चर्चा रंगू लागली आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे ८ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विजेतेपदासाठी सामना रंगणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघात काही बदल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतिहास पाहिला तर टी-२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा भारतावर वरचष्मा राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये झालेल्या तीनही टी-२० विश्वचषक सामन्यांत न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. त्यामुळे या अंतिम सामन्यात भारतीय संघासाठी ही मोठी कसोटी मानली जात आहे. मात्र एकूण टी-२० सामन्यांचा विचार केला तर भारताचा वरचष्मा दिसतो. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३० टी-२० सामने झाले असून त्यापैकी भारताने १६ सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने ११ सामने जिंकले आहेत.
भारतीय संघाने उपांत्य फेरीत इंग्लंडवर ७ धावांनी थरारक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ७ गडी गमावून २५३ धावांचा मोठा स्कोअर उभा केला. या सामन्यात संजू सॅमसनने ४२ चेंडूत ८९ धावांची शानदार खेळी केली.
मात्र या सामन्यात भारतीय गोलंदाजांची कामगिरी अपेक्षेइतकी प्रभावी ठरली नाही. अर्शदीप सिंगने ४ षटकांत ५१ धावा देत एक विकेट घेतली, तर वरुण चक्रवर्तीने ४ षटकांत ६४ धावा दिल्या. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी संघात बदल होऊ शकतात का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही तज्ज्ञांच्या मते, स्पिन विभाग अधिक मजबूत करण्यासाठी कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते.
पण वरुण चक्रवर्तीला संघ व्यवस्थापनाचा पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. उपांत्य सामन्यानंतर अक्षर पटेलने सांगितले की, वरुण हा संघासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याच्याकडे उत्तम कौशल्य आहे. दबावाच्या परिस्थितीत काही चुका होऊ शकतात, पण आत्मविश्वास टिकवून ठेवणे महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले.
दरम्यान माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने वरुण चक्रवर्तीला पाठिंबा दिला आहे. त्याच्या मते, अंतिम सामन्यापूर्वी खेळाडूंचा मानसिक ताण कमी करणे महत्त्वाचे आहे. त्याने सुचवले की, खेळाडूंना काही काळ विश्रांती देऊन सकारात्मक मानसिकतेसह अंतिम सामन्यासाठी तयार करणे गरजेचे आहे.
फलंदाजी विभागातही काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. सलामीवीर अभिषेक शर्माचा फॉर्म या स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे राहिलेला नाही. सात डावांत त्याने केवळ ८९ धावा केल्या आहेत. उपांत्य सामन्यातही तो मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात त्याला संधी मिळेल का, याबाबत चर्चा सुरू आहे.
मात्र काही माजी खेळाडू आणि संघातील सहकारी त्याच्यावर विश्वास व्यक्त करत आहेत. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने अभिषेकला संघातून वगळू नये, असे मत व्यक्त केले आहे. संजू सॅमसनने सांगितले की, संघाला अजूनही अभिषेकवर पूर्ण विश्वास आहे आणि अंतिम सामन्यात तो मोठी खेळी करू शकतो.
अहमदाबादमधील अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये फारसे बदल होण्याची शक्यता नाही. भारताकडून अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती किंवा कुलदीप यादव असा संभाव्य संघ असू शकतो.
न्यूझीलंडकडून टिम सिफर्ट, फिन अॅलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सॅन्टनर, कोल मॅककॉन्ची, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन अशी संभाव्य प्लेइंग इलेव्हन असू शकते.
आता सर्वांचे लक्ष अहमदाबादमधील अंतिम सामन्याकडे लागले आहे. भारतीय संघाला इतिहास घडवण्याची संधी आहे आणि या सामन्यात कोणता खेळाडू संघासाठी निर्णायक ठरतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.