

India Pakistan T20 World Cup Rematch: 15 फेब्रुवारीला झालेल्या थरारानंतर भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार का? सध्या सुरू असलेल्या ICC Men's T20 World Cup 2026 मध्ये दोन्ही संघांची पुन्हा टक्कर होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. मात्र त्यासाठी समीकरण जुळणं गरजेचं आहे. भारताने आधीच सुपर-8 मध्ये एन्ट्री केली आहे. पाकिस्तानला मात्र अजून एक पाऊल टाकायचं आहे, नामीबियाविरुद्धचा सामना जिंकला तरच त्यांचा सुपर-8 मधील प्रवेश निश्चित होईल.
जर पाकिस्तानने नामीबियाला हरवले, तर तो ग्रुप A मधून भारतासोबत पुढील फेरीत पोहोचेल. इतर ग्रुप्समधून अपेक्षेप्रमाणे संघ पात्र ठरले, तर सुपर-8 मध्ये पुढील संघ दिसू शकतात —
ग्रुप B: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका
ग्रुप C: वेस्ट इंडीज, इंग्लंड
ग्रुप D: न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका
या परिस्थितीत सुपर-8 चे दोन संभाव्य गट असे असू शकतात:
ग्रुप 1: भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका
ग्रुप 2: इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका
या रचनेनुसार सुपर-8 मध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटात नसतील. म्हणजे या फेरीत दोन्ही संघांची थेट लढत होण्याची शक्यता कमी आहे. भारताला सुपर-8 मध्ये दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजविरुद्ध सामने खेळावे लागतील, तर पाकिस्तान इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरेल.
मात्र खरी उत्सुकता सेमीफायनलची आहे. जर भारत ग्रुप 1 मधून सेमीफायनलमध्ये पोहोचला आणि पाकिस्तान ग्रुप 2 मधून पात्र ठरला, तर सेमीफायनलमध्ये पुन्हा एकदा भारत–पाकिस्तान महामुकाबला पाहायला मिळू शकतो.
आणखी एक शक्यता अशीही आहे की, दोन्ही संघ आपापल्या गटात टॉपवर राहिले, तर मग चाहत्यांना भारत–पाकिस्तान सामना पाहण्यासाठी थेट फायनलची वाट पाहावी लागेल.
आधीचा सामना कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियम येथे झाला होता, आणि योगायोगाने पुढील सामनाही याच मैदानावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत, पुढचा भारत–पाक सामना होणार की नाही हे पूर्णपणे पाकिस्तानच्या पात्रतेवर आणि सुपर-8 मधील निकालांवर अवलंबून आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी पुढचे काही दिवस प्रचंड रोमांचक असणार आहेत.