

MP IAS Avi Prasad Marries for Third Time: मध्य प्रदेशमधील IAS अधिकारी अवी प्रसाद पुन्हा एकदा चर्चेत आहेत. 2014 बॅचचे अवी प्रसाद नुकतेच तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले असून विशेष बाब म्हणजे त्यांच्या तिन्ही पत्नी IAS अधिकारी आहेत.
सध्या अवी प्रसाद हे मध्य प्रदेश रोजगार हमी परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्यांनी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा पंचायत CEO तसेच कलेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. मूळचे उत्तर प्रदेशातील असलेल्या अवी प्रसाद यांचा प्रशासनातील प्रवास जितका वेगवान आहे, तितकेच वेगवान त्यांचे वैयक्तिक आयुष्यही आहे.
अवी प्रसाद यांनी पहिलं लग्न 2014 बॅचच्या IAS अधिकारी रिजू बाफना यांच्याशी केलं होतं. मात्र काही काळातच दोघांमध्ये मतभेद झाले आणि घटस्फोट झाला. सध्या रिजु बाफना या शाजापूर जिल्ह्याच्या कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत.
पहिल्या विवाहानंतर अवी प्रसाद यांनी 2016 बॅचच्या IAS अधिकारी मिशा सिंग यांच्याशी दुसरं लग्न केलं. विवाहानंतर मिशा सिंह या मध्य प्रदेशमध्ये ट्रान्सफर झाल्या. मात्र हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. सुमारे चार वर्षांनंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. सध्या मिशा सिंह या रतलामच्या कलेक्टर आहेत.
अवी प्रसाद यांनी नुकतेच 2017 बॅचच्या IAS अधिकारी अंकिता धाकरे यांच्याशी तिसरं लग्न केलं आहे. अंकिता धाकरे या सध्या राज्य मंत्रालयात डेप्युटी सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. दोघांचा विवाह 11 फेब्रुवारी 2026 रोजी कुनो राष्ट्रीय उद्यानात पार पडला.
अवी प्रसाद यांचा प्रशासकीय प्रवासही तितकाच इंटरेस्टिंग आहे. UPSC परीक्षा देण्याआधी त्यांची RBI मध्ये मॅनेजर पदावर निवड झाली होती. त्यानंतर 2013 मध्ये त्यांनी UPSC क्रॅक करून IPS अधिकारी म्हणून सेवेत प्रवेश केला. पुढच्याच वर्षी, म्हणजे 2014 मध्ये, त्यांनी पुन्हा परीक्षा देत 12 वी रँक मिळवली आणि IAS अधिकारी बनले.
अवी प्रसाद यांनी दिल्ली विद्यापीठातून LLB केलं असून जोधपूरच्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतून MBA (बिझनेस लॉ आणि फायनान्स) पूर्ण केलं आहे. सध्या ते मनरेगा कमिश्नर म्हणूनही काम पाहत आहेत. याशिवाय त्यांच्याकडे वॉटरशेड मिशनचे (PMKSY 2.0) डायरेक्टर आणि PM पोषण शक्ती निर्माण योजनेचे राज्य समन्वयक अशी अतिरिक्त जबाबदारी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवी प्रसाद यांचे आजोबा टम्बेश्वर प्रसाद उर्फ बच्चा बाबू हे चौधरी चरण सिंह यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. तीन विवाह, तिन्ही IAS अधिकारी, आणि प्रशासनातील वेगवान कारकीर्द, या सगळ्यामुळे अवी प्रसाद यांची कहाणी सध्या सोशल मीडिया आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेत आहे.