

Surya Kumar Yadav On Abhishek Sharma: टी २० वर्ल्डकप २०२६ मधील साखळी फेरीत भारताचा धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्माकडून मोठी अपेक्षा होती. मात्र त्याला आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही. त्याला टी २० क्रिकेटमध्ये गेल्या ७ सामन्यात तब्बल ५ वेळा भोपळाही फोडता आलेला नाही. अभिषेकने टी २० वर्ल्डकपमध्ये गेल्या तीन सामन्यात सलग तीनवेळा शुन्यावर बाद झाला आहे.
अभिषेक शर्माच्या या खराब कामगिरीनंतर आता त्याला संघातून वगळून बेंचवर बसलेल्या संजू सॅमसनला संधी द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत आता भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने देखील वक्तव्य केलं आहे.
रेव्ह स्पोर्ट्सनं दिलेल्या वृत्तानुसार सूर्यकुमार यादव म्हणाला की, 'मला त्या लोकांची काळजी वाटते जे लोक अभिषेक शर्माबद्दल काळजी करत आहेत. मला तर ते संघ इथून पुढे त्याचा सामना करणार आहेत त्यांच्याबाबत काळजी आहे. त्याने गेल्या वर्षात सर्वकाही केलं आहे आता आम्ही त्याचे उपकार फेडण्याची वेळ आली आहे.'
जागतिक टी २० क्रिकेट बॅटिग रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या अभिषेक शर्माला टी २० वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळं चाहते आणि जाणकार त्याच्याबाबत चर्चा करत आहेत. याबाबत टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल म्हणतो की, आमच्या संघात अभिषेकच्या फॉर्मबाबत अजिबात चर्चा नाहीये.
तो पुढे म्हणतो, 'अभिषेक हा जागितक दर्जाचा फलंदाज आहे. सध्या धावा होत नसलेल्या अभिषेकसोबत सुदैवानं लोकं उभी आहेत. आता आम्ही टी २० वर्ल्डकपच्या एका महत्वाच्या टप्प्यातून जात आहोत आणि मला विश्वास आहे की तो आपली सर्वोत्तम कामगिरी करेल.'
भारताचा सुपर ८ मधील पहिला सामना हा तगड्या दक्षिण अफ्रिकेविरूद्ध आहे. हा सामना २२ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत सुपर ८ मध्ये दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे यांच्याविरूद्ध खेळणार आहे.