

नवी दिल्ली : स्टार फलंदाज शुभमन गिलबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. शुभमन गिलचे संघात पुनरागमन झाले असून त्याच्यासोबतच अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा २०२५ मधील प्रवास आता संपला असून, नवीन वर्षात 'टीम इंडिया' पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे. जानेवारी महिन्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय (ODI) आणि टी-२० मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नसली तरी, टी-२० संघाची घोषणा अलीकडेच करण्यात आली.
गेल्या काही काळापासून क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये (T20I) समाधानकारक कामगिरी न करू शकल्यामुळे शुभमन गिलला टी-२० संघात स्थान मिळालेले नाही. मात्र, राष्ट्रीय संघातून डच्चू मिळालेला असतानाच गिलची आता एका दुसऱ्या संघात निवड झाली आहे. गिलची ही निवड भारतीय संघासाठी नसून विजय हजारे ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या पंजाबच्या संघात करण्यात आली आहे.
पंजाब क्रिकेट असोसिएशनने (PCA) आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी १८ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंह या तीन आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पंजाबच्या मोहिमेची सुरुवात २४ डिसेंबर रोजी महाराष्ट्राविरुद्धच्या सामन्याने होईल.
या तीन स्टार खेळाडूंच्या व्यतिरिक्त पंजाबने पॉवर-हिटर्स आणि अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला एक संतुलित संघ निवडला आहे. यात यष्टीरक्षक-फलंदाज प्रभसिमरन सिंग, नमन धीर, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, सनवीर सिंग आणि हरप्रीत ब्रार यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा गुरनूर ब्रार आणि क्रिश भगत यांच्या खांद्यावर असेल.
विशेष म्हणजे, पंजाबने आपल्या अधिकृत घोषणेमध्ये अद्याप कर्णधाराचे नाव जाहीर केलेले नाही, ज्यामुळे नेतृत्व कोणाकडे असेल, या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग हे तिघेही संपूर्ण स्पर्धेसाठी उपलब्ध असतील की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. भारतीय संघाला ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे, ज्यानंतर २१ जानेवारीपासून पाच टी-२० सामने होतील. शुभमन गिलला टी-२० संघातून वगळण्यात आले असले तरी, तो एकदिवसीय संघात भारताचे नेतृत्व करताना दिसू शकतो. दुसरीकडे, अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग हे भारताच्या टी-२० संघाचे महत्त्वाचे सदस्य आहेत.
गेल्या हंगामात पंजाबचा संघ विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर झाला होता. २०२४-२५ च्या सत्रात अर्शदीप सिंग हा संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. यावेळी पंजाब आपले सर्व सात साखळी सामने जयपूरमध्ये खेळणार आहे. पंजाबच्या गटात छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, गोवा आणि मुंबई यांसारख्या बलाढ्य संघांचा समावेश आहे. साखळी फेरीचे सामने ८ जानेवारीला संपतील, जे भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिका सुरू होण्याच्या तीन दिवस आधी आहे.
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), हरनूर पन्नू, अनमोलप्रीत सिंग, उदय सहारण, नमन धीर, सलिल अरोरा (यष्टीरक्षक), सनवीर सिंग, रमणदीप सिंग, जशनप्रीत सिंग, गुरनूर ब्रार, हरप्रीत ब्रार, रघु शर्मा, क्रिश भगत, गौरव चौधरी, सुखदीप बाजवा.