

Sanju Samson IND vs AFG: दिल्लीत झालेल्या अफगाणिस्तानविरूद्धच्या दुसऱ्या टी २० सामन्यात अनेक दिवसांपासून धावांच्या प्रतिक्षेत असलेल्या संजू सॅमसनने तुफानी खेळी केली. त्याने २२ चेंडूत ५७ धावा ठोकत भारताच्या ७ विकेट्स राखून मिळवलेल्या विजयात मोलाचा वाटा उचलला. धावांचा दुष्काळ संपवल्यानंतर माईकवर येऊन त्याने फटकेबाजी केली. त्याने आपल्या टीकाकारांना उत्तर दिलं. तसेच वैभव सूर्यवंशीसोबतच्या स्पर्धेबाबत देखील मोठं वक्तव्य केलं.
संजूच्या मते भारतीय क्रिकेटपटूंच्या अवती भवती घडणाऱ्या घटनांचा त्यांच्यावर परिणाम होतोच. आता मी अनुभवी खेळाडू झालो असून त्याच्याशी कसं डील करायचं हे मी शिकलोय असं सांगत संजूनं सडेतोड उत्तर दिलं. मात्र शेवटी संजू सॅमसन देखील एक माणूस आहे त्यामुळं काही गोष्टींचा त्याच्यावर देखील प्रभाव पडतो असं संजू सांगतो.
संजू सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला की, 'मी Wi-Fi बंद करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र तरी देखील कधी कधी Wi-Fi ऑन होतं अन् काही कमेंट्स दिसतात. काही वरिष्ठ खेळाडू त्याच्याबाबत काही म्हणतात आणि काहीजण काहीही म्हणत नाहीत. ही त्यांची वैयक्तिक चॉईस आहे आणि त्यावेळी कोणती मानसिक स्थिती असते त्यावर ते अवलंबून आहे. काहीजण सकारात्मक शब्दांची निवड करू शकतात तर काही जण नकारात्मक.'
संजू पुढे म्हणाला की, मी आता इतका सजग आणि अनुभवी झालो आहे की मी या गोष्टी सांभाळू शकतो. कधी कधी काही गोष्टींचे वाईट वाटते अशी प्रांजळ कबुली देखील संजूने दिली.
'मी काही मशिन नाही. मी रोबोट नाही. तुमच्यावर थोडा तरी परिणाम होतोच. मात्र त्यानंतर तुम्ही स्वतःशीच बोलता आणि स्वतःला या तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय करायचं आहे हे याची आठवण करून देता.
संजूने भारतीय क्रिकेटपटूंसाठी बाहेरचा आवाजापासून वाचणे शक्य नसल्याचं सांगितलं. सोशल मीडिया, टीका आणि सतत होणाऱ्या चर्चांमध्ये खेळाडूंना आपल्या माईंडसेटबाबत स्पष्ट राहणं गरजेचं असतं.
संजू सॅमसनसाठी स्पर्धा वाढली आहे. १५ वर्षाचा वैभव देखील आता आपल्या कामगिरीने आपली सलामीची जागा मजबूत करू पाहतोय. वैभवने या हंगामात ७०० ते ८०० धावा केल्या आहेत. संजू स्वतः त्याच्याबद्दल बोलला. त्याने मान्य केलं की वैभवला संधी मिळणं सहाजिक होतं. भारतीय संघ चालवणं खायचं काम नाही. तुम्ही बघा १५ वर्षाच्या मुलानं ७०० ते ८०० धावा केल्या आहेत.